मुंबई-गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे शहरात धुळीचा त्रास नागरिकांना होत आहे. चिपळूण शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. या पुलासाठी एजन्सीकडून पिलर उभारण्यात येत आहेत. गतवर्षी उड्डाणपुलाचे गर्डर तुटल्यामुळे पूल नव्याने उभारला जात आहे. पिलरचा वरील भाग कापला जात असल्यामुळे धूळ तयार होत आहे. त्याचा त्रास शहरातील नागरिकांसह महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना होत आहे. महामार्गालगत असलेल्या नागरिकांच्या घरात आणि दुकानात धूळ जात आहे. त्यामुळे घरांच्या खिडक्या, दरवाजे दिवसा बंद केल्याशिवाय पर्याय राहत नाही. घरांच्या भिंतीवर आणि गाड्यांवरही धूळ साचत आहे. त्यामुळे नागरिकांना सतत वाहने आणि घरांच्या भिंती धुवाव्या लागत आहेत. बहादूरशेख नाक्यापासून पाग बौद्धवाडीपर्यंत हा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
रात्री पिलर कापण्याचे काम सुरू असते. असह्य आवाजामुळे नागरिकांची झोपही पूर्ण होत नाही. चिपळूणमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. गाड्यांच्या रहदारीमुळे धुळीचे लोट घराघरात शिरत आहेत. धुळीच्या त्रासाने चिपळूणकर सध्या बेजार झाले आहेत. मार्कंडीतील प्रभातरोड व आजूबाजूचे रस्ते व चिपळुणातील अन्य रस्त्यांवरदेखील धुळीचे साम्राज्य आहे. शहरात महानगर गॅसकडून गॅसलाईन टाकण्यासाठी खोदाईचे काम सुरू आहे. खोदाई करून पाईपलाईन टाकण्यात येत आहे; पण, पाईपलाईन टाकून झाल्यावर ते चर नुसते बुजवले जात असल्याने रस्त्यावरील धुळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ज्या ठिकाणी धुळीचा त्रास निर्माण होत आहे. त्या ठिकाणी पालिकेचे टँकर पाठवून मातीवर पाणी मारले जात आहे. त्यातून धुळीचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याशिवाय शहरातील खोदलेल्या रस्त्यावर खडीकरण आणि डांबरीकरणही केले जात आहे.