देशभरामध्ये विविध प्रकरणामध्ये सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईमुळे अनेक चर्चाना ऊत आला आहे. सातारा कोपरगाव येथील जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढला आहे. जरंडेश्वर प्रकरण बरेच दिवस चांगलाच गाजत आहे. ईडीच्या अनेक संबंधित बँकांना नोटीस जात असल्याची चर्चा असताना, ईडीची नोटीस रत्नागिरीमधील एका बँकेला सुद्धा आल्याची माहिती मिळाली आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, १५ जुलै पर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.
जरंडेश्वर साखर कारखान्याने बँकेचे कर्ज थकवल्याप्रकरणी कारखान्यावर जप्तीचा बडगा उगारण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयात सदर प्रकरणी अण्णा हजारे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल १ कोटीहून कमी आहे, अशा कंपनीने ६० कोटी रुपयांहून अधिक किमतीचा साखर कारखाना खरेदी केलाच कसा? या संपूर्ण प्रकरणाच्या आर्थिक व्यवहारामध्ये काहीतरी काळबेर दिसून आल्याने ईडीने ही कारवाई केली.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकाचा संबंधित जरंडेश्वर साखर कारखाना असून, अनेक ठिकाणाहून त्याला कर्ज पुरवठा करण्यात आल्याची माहिती ईडीकडे आली असून, म्हणून अनेक बँकांवर ईडी चौकशीसाठी पत्रव्यवहार करत आहे. प्रथम ईडीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून माहिती मागवली आहे. त्यापाठोपाठ पुणे, सिंधुदुर्ग आणि आता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून देखील पत्राद्वारे माहिती मागविली आहे. जरंडेश्वर साखर कारखान थकीत कर्ज प्रकरणात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ८ कोटी ७५ लाखांचा कर्जपुरवठा केलेला आहे. त्यासाठी तीनशे कोटीची जमीन तारण ठेवण्यात आली असून, ईडीने कशा पद्धतीने कर्ज पुरवठा करण्यात आला आहे!, त्यासाठी काय तारण ठेवण्यात आले आहे, या संबंधित माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे मागण्यात आली आहे.