शीळ धरण ते शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलपर्यंत टाकण्यात येणारी पाईपलाईन डिसेंबर २०२४ संपला तरी अजून टाकण्यात आलेली नाही. नव्याने टाकलेली ही पाईपलाईन गेल्या पावसामध्ये वाहून गेली. शीळ नदीतून जॅकवेलपर्यंत सहा फ्लोटिंग पंपाद्वारे पाणी उचलून ते जॅकवेलमध्ये आणले जाते. तेथून ते साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आणून शहराला वितरित होते. पाईपलाईन न टाकल्यामुळे सहा फ्लोटिंग पंपाच्या लाखोंच्या वीजबिलाचा भूर्दंड पालिकेवर पडत आहे तसेच तात्पुरत्या व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत असून टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. रत्नागिरी शहराची सुधारित नळपाणी योजना अजूनही अपूर्णच असल्याचे चित्र आहे. शहराच्या अनेक भागातून पाणीटंचाई जाणवते. वारंवार पाईप फुटत आहेत. डिसेंबरमध्ये शहराच्या काही भागात केवळ १५ मिनिटे पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मग ६८ कोटींच्या सुधारित नळपाणी योजनेचा उपयोग काय ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ जॅकवेल २०२३ला कोसळले. त्यानंतर शहराला काही दिवस पाणी नव्हते. नवीन जॅकवेल अत्यंत जलदगतीने कार्यान्वित करण्यात आली; मात्र शीळ धरण ते जॅकवेल ही जलवाहिनी टाकण्याचे काम मागेच पडले. त्यामुळे पावसापूर्वी शीळ धरण ते जॅकवेल अशी शीळ नदीच्या पात्रातून पाईप टाकण्यात आली; परंतु पावसाळ्यात ही पाईप वाहून गेली. त्यामुळे पावसाळ्यात वाहिनी टाकण्याचे काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे धरणाच्या ओव्हरफ्लोचे पाणी अडवून त्यामध्ये सहा फ्लोटिंग पंप बसवण्यात आले आहेत. या पंपाच्या साहाय्याने पाणी उचलून ते जॅकवेलमध्ये आणले जाते. तेथून ते साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणून शहराला वितरित होते; परंतु ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. यावर आता ताण पडत आहे. आज याच पंपांच्या साह्याने शीळ धरणाच्या ओव्हरफ्लोमधून पाणी उचलण्यात येते. वेळीच शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत पाईपलाईन टाकली गेली नाही. ऐन पावसाळ्यात पुन्हा टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.