चिपळूण शहरात वारंवार वीज जाण्याचा प्रकार घडत आहे. जुनी उपकरणे आणि वितरण व्यवस्थेत होणारा बिघाड, अकार्यक्षम व्यवस्थापन आणि योग्य माहिती ग्राहकांपर्यंत पोचवण्यात येणारे अपयश यामुळे चिपळूणवासीय त्रस्त झाले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी बैठक घेतली होती. त्यानंतरही परिस्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शहरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. शहरात सुमारे ३५ हजार ग्राहक आहेत. पाग, मुरादपूर आणि खेर्डी येथील उपकेंद्रातून चिपळूण शहराला वीजपुरवठा होतो. खेडीं उपकेंद्रावरून होणाऱ्या वीजपुरवठ्यात अडथळा असलेल्या झाला तर त्या केंद्रावर अवलंबून ग्राहकांना पाग किंवा मुरादपूर येथील उपकेंद्रातून वीज दिली जाते.
या सुधारणांसाठी महावितरण कंपनीने कोट्यवधी रुपये खर्च केले असतानाही शहरातील ग्राहकांना अंधारात राहावे लागते. आमदार निकम यांनी काही दिवसांपूर्वी ग्राहक आणि महावितरणचे अधिकारी यांची बैठक घेतली. त्यात नागरिकांनी काही मुद्दे मांडले होते. शहरातील जुन्या झालेल्या ट्रान्समिशन वाहिन्या, ट्रान्स्फॉर्मर आणि इतर उपकरणांमधील बिघाड तसेच वितरण जाळ्याची अपुरी क्षमता यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक फांद्या तोडण्यासाठी फेब्रुवारीपासून पुढे पेट्रोलिंग केले जाते. पावसाळ्यात विजेच्या तारावर फांदी पडून वीजपुरवठा बंद झाल्याचे कारण महावितरणकडून दिले जाते. शहरात अनेक ठिकाणी केबल, वायर, ओव्हरहेड वायर, निकृष्ट वायरचे जाळे पसरले आहेत.