महावितरणद्वारे गावात आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या स्मार्टमीटर/इलेक्ट्रिक मीटर बसवण्याबाबत ग्रामस्थांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. हे मीटर ज्यांची घरे बंद आहेत, ज्यांच्या घराच्या आवाराला कुलूप आहे, ज्यांच्या घरांचे गेट बंद आहे अशाच घरातील मीटर बदलले जात आहेत. याबाबत संबंधित महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात येत नाही. कोणताही शासकीय आदेश नाही, मीटरधारकांची कोणतीही परवानगी नाही. असे असताना घराच्या आवारात बेकायदेशीररीत्या घुसून जुने मीटर काढून त्या जागी दुसरे मीटर लावले आहेत. महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा लेखी आदेश न देता अगदी घरात कोणी नसतानाही जुने मीटर काढून नवीन मीटर बसवत आहेत.
जेव्हा ग्राहकाला त्याचा विद्यमान मीटर सदोष वाटतो तेव्हा त्याला तो बदलण्यासाठी महावितरणाकडे अर्ज करून शुल्क भरावे लागते. त्याचप्रमाणे, महावितरणला स्वतःहून मीटर बदलायचा असेल तर ग्राहकांना शासनाच्या निर्णयाची माहिती देऊन रितसर नोटीस देणे बंधनकारक आहे. तसे न करता परस्पर मीटर बदलले जात आहेत. जुने मीटर काढून नवीन मीटर बसवताना जुन्या मीटरमधील अंतिम रीडिंग ग्राहकाला दाखवले जात नाही. नवीन बसवलेल्या मीटरमधील शून्य रीडिंग दाखवले जात नाही. जेव्हा मीटर रीडिंग घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा कर्मचारी घर बंद असल्यास, गेट बंद असल्यास किंवा कुलूप असल्यास रीडिंग घेत नाहीत आणि सरासरी बिल पाठवतात; मात्र मीटर बदलण्यासाठी ग्राहक घरी नसतानाही मीटर बदलले आहेत. या तक्रार अर्जावर सुनील सुर्वे, राजेंद्र कदम, दत्ताराम सुर्वे, सतीश सुर्वे यांच्यासह ४० ग्रामस्थांच्या सह्या आहेत.