जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हातखंबा गटातून बंडखोरी करणारे युवा सेना कोकण विस्तारक परशुराम मारुती कदम यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी अधिकृत पत्रक काढून ही माहिती दिली. या कारवाईनंतर युवासेना जिल्हाप्रमुख केदार ऊर्फ मुन्ना देसाई यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा जिल्हा परिषद गटातून शिवसेनेने सुयोग नंदकुमार कांबळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली; मात्र पक्षाचा आदेश डावलून याच गटातून युवासेनेचे कोकण विस्तारक परशुराम कदम यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी केवळ अर्जच भरला नाही, तर ते अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उभे राहून निवडणूक लढवत आहेत.
परशुराम कदम हे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवून पक्ष संघटनेच्या विरोधात काम करत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पक्षशिस्तीचे उल्लंघन आणि बंडखोरी केल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, असे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. हातखंबा जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारासमोर स्वकीयांनीच आव्हान उभे केल्यामुळे पेच निर्माण झाला होता. या हकालपट्टीच्या निर्णयामुळे शिवसेनेने आपल्या कार्यकर्त्यांना शिस्त पाळ; अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा स्पष्ट संदेश दिला आहे.
अन्य बंडखोरांचे काय ? – जिल्ह्यात शिवसेनेचे काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात जात बंडखोरी केली आहे. पक्षशिस्तीचा भंग म्हणून त्यांच्यावरही हकालपट्टीची कारवाई होणार का, असा प्रश्न शिवसैनिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अशीच एका एकाची हकालपट्टी करा – माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्यावर कारवाई झाल्यानंतर हातखंबा गटातीलच युवासेनेचे जिल्हाप्रमुख केदार ऊर्फ मुन्ना देसाई यांनी आपल्या पदाचा वैयक्तिक अडचणीमुळे राजीनामा दिला आहे; मात्र राजीनामा दिल्यानंतर स्टेटस लावला आहे. त्यामध्ये ‘असेच एका एकाची हकालपट्टी करा…’ असा ठळक मजकूर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे कदम यांच्या हकालपट्टीऐवजी मुन्ना देसाई यांच्या राजीनाम्याची चर्चा अधिक रंगली आहे.

