कोकणात हंगामात आंबा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे. प्रत्येक हंगामामध्ये रत्नागिरीच्या चवदार हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्या हंगामात वाहतुकीची अनेक साधने उपलब्ध असली तरी देखील मागणी जास्त असल्याने, वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो. पर्यटक आणि चाकरमानी देखील मोठ्या प्रमाणात कोकण रेल्वे मार्गाने ये जा करतात. त्यामुळे गर्दी होऊन वाहतुकीस देखील अडथळ्याच्या समस्या निर्माण होतात
आमदार शेखर निकम यांनी कोकण रेल्वेच्या बैठकीत विविध मागण्या मांडल्या असून, त्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. कोकण रेल्वेला स्वतंत्र निधी मिळावा, रत्नागिरी-पनवेल मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक असल्याने आणि गर्दी जास्त प्रमाणात होत असल्याने जादा गाड्या सोडण्यात याव्यात. चिपळूण, सावर्डे, कडवई आणि संगमेश्वर या स्थानकात काही गाड्या थांबवून तेथील प्रवाशांच्या देखील समस्याचे निरसन झाले पाहिजे.
शिमगा, गणेशोत्सव अशा सणांवेळी जादा गाड्यांची संख्या वाढवावी. तसेच रत्नागिरी हापूस आंबा वाहतुकीसाठी स्पेशल मँगो पार्सल व्हॅन दिल्ली एर्नाकुलम या मार्गावर सोडण्यात यावी, जेणेकरून कोकणातील स्थानिक व्यावसायिकांना त्यामध्ये अधिकाधिक नफा मिळेल. त्यावेळी संबंधित अधिकार्यांनी सकारात्मक चर्चा करून कार्यवाहीचे ठोस आश्वासन दिले.
जम्मू-काश्मिर येथील चिनाब पुलाची पाहणी आणि कोरे सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, तसेच कोरेचे संजय गुप्ता, आशिष पेडेकर, विजय केनेवडेकर, गोवा खासदार विनय तेंडुलकर, इराना कडाडी, चंद्रकांत गवस, सचिन वहाळकर, संतोषकुमार झा, नंदू तेलग आदी उपस्थित होते. या बैठकीत आमदार निकम यांच्यासह खासदार राऊत व सचिन वहाळकर यांनी जिल्ह्यातील रेल्वेचे प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडले.
चिपळूण-सावर्डे, कडवई आणि संगमेश्वर येथील प्रश्न मांडताना जिल्ह्यातील प्रवाशीवर्गाचे होणारे हाल आणि अनेक वर्षे न सुटलेले प्रश्न मांडून त्या संदर्भात तात्काळ ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली.