मुंबईमध्ये काल रात्री आलेल्या निनावी फोनमुळे एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर बॉम्ब ठेवण्यात आला असून, असा घातपाताचा फोन आल्यानंतर रेल्वे आणि स्थानिक पोलिसांमध्ये एकच गडबड झाली. यानंतर तातडीने घटनास्थळी पोलीस, बॉम्ब स्कॉड आणि श्वान पथक दाखल झाले असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लगतच्या परिसराची तपासणी केल्यानंतर तिथे कोणतीही घटक अथवा संशयास्पद वस्तू असे काही आढळून आले नसल्याची माहिती मिळाली आहे.
शुक्रवारी रात्री रेल्वे विभागाला ९.४५ वाजण्याच्या दरम्यान एक निनावी फोन आला, ज्याच्यानंतर मुंबई पोलिस, डॉग स्कॉड आणि बॉम्ब स्कॉडकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. तसेच या निनावी कॉलनंतर भायखळा आणि दादर रेल्वे स्थानकावर देखील मुंबई पोलिसांची टीम तैनात करण्यात आली. स्थानकामध्ये येणाऱ्या जाणार्या प्रत्येकाची चौकशी पोलिसांकडून केली जात होती.
पोलिसांनी दिलेल्या नंबरवर जेव्हा फोन केला तेव्हा त्याने समोरून आपण बिझी असल्याचं सांगितलं आणि नंतर मोबाईल स्विच ऑफ केला त्यानंतर पोलिसांचा संशय अजूनच बळावला आणि मुंबई पोलिसांनी फेक कॉल करणाऱ्या इसमाचा शोध त्वरितच सुरु केला. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचा लोकेशनच्या आधारावर त्यांचा शोध सुरू केला आणि त्यांना कल्याण शिळ फाटावरून दोघांना ताब्यात घेतलं. जेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा राजू अंगारे आणि रमेश शिरसाट हे दोघे गटारीची पार्टी करत होते. हे दोघे मित्र डोंबिवली येथे राहत असून, मद्यधुंद अवस्थेत त्यांनी पोलिसांची सतर्कता तपासण्यासाठी हा खोटा कॉल केल्याची त्यांनी कबुली दिली. त्यामुळे काही तासांमध्येच मुंबई पोलीसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत.