हल्ली सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने हातोहाथ दागिने पळविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. घरात वृद्ध किंवा एकट्या महिला असल्याचे बघून काहीतरी कारण काढून त्यांच्या घरात शिरतात आणि मग किमती वस्तू, सोन्याचे ऐवज घेऊन पोबारा करतात. पोलीस अनेक वेळा या प्रकरण बाबत जनजागृती करत असतात, परंतु हे भुरटे चोर अशाच घरात घुसतात, जिथून त्यांच्या मदतीला कोणी येऊ शकणार नाही.
गुहागर तालुक्यातील तळवली येथे काल दुपारी दोन युवक तांबे – पितळची भांडी व बांगडया साफ करणारे असे ओरडत फिरत होते. यावेळी एका महिलेच्या घरी ते गेले असता भांडी व बांगड्या पॉलिश करून देतो असे सांगून सोन्याच्या काही वस्तू आहेत का विचारू लागले. महिलेला त्यांच्यावर संशय दटावला म्हणून तिने आमच्याकडे काही नाही सांगून त्याना जाण्यास सांगितले. जाण्यास सांगूनही दागिन्यांसाठी विचारणा करत होते. शेवटी त्या महिलेने हळूच बाहेर जाऊन शेजारील लोकांना हा सारा प्रकार सांगितला.
त्यानंतर शेजारी पाजारी सर्व एकत्र आले आणि त्यांनी दोघांना पकडले. याबरोबर ते दोघे घाबरून गेले. जमावाने त्यांची संपूर्ण माहिती विचारुन घेतली असता, ते बिहार येथून चिपळूणला आले व तेथून तळवली येथे आले असल्याचे कळले. त्यांनी सोबत आणलेले आधारकार्ड सुद्धा बोगस असल्याचे निदर्शनास आले. आता आपली सुटका नाही हे कळताच त्यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याचवेळी ग्रामस्थांनी पाठलाग करून त्यांना पकडले आणि चांगला चोप दिला. त्यानंतर ग्रामस्थांनी दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.