भातशेती कापणीला सुरवात झाली असून, शेतशिवार गजबजली आहेत; मात्र रानडुकरांसह रानटी जनावरांचा शेतामध्ये सुरू असलेल्या ‘रात्रीस खेळा’ने शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत. शेतामध्ये घुसून रानटी प्राणी भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. त्यामध्ये हातातोंडाशी आलेला भातशेतीचा घास हिरावून जाणारा आहे, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. अनियमित पावसामुळे यंदा भातशेतीला फटका बसणार आहे. आर्थिक नुकसान सोसून शेतकऱ्यांनी यंदा भातलावणी उरकली होती.
ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप घेतल्यामुळे बळीराजा धास्तावला होता; मात्र सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्यामुळे भातशेतीला फायदा झाला. भातशेती कापणीयोग्य झाली आहे. अनेक ठिकाणी कापणीला सुरवातही झाली आहे. या तयार भातपिकात घुसणाऱ्या वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर टाकली आहे. रानटी जनावरे रात्री शेतामध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. भातशेतीच्या राखणीसाठी शेतकरी शेताच्या बांधावर रात्रीची जागरणेही करतान दिसत आहेत.
सुरक्षेचे उपाय फेल – रानटी जनावरांना रोखून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतात बुजगावणी उभी करणे, रात्रीचे शेताच्या बांधावर कंदील वा विजेचे बल्ब रात्रभर प्रकाशित ठेवणे, वाऱ्यासोबत आवाज येणाऱ्या कॅसेटच्या रील ताणून ठेवणे यांसारख्या विविध क्लृप्त्या केल्या जात आहेत.