राज्यातील शाळा सुरु होण्यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरू होणार आहे. तर १३ जून रोजी पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊस हा कार्यक्रम होणार आहे. काही शाळा या ६ जून पासून सुरु करण्यात आल्या आहेत तर काही शाळा या १३ तारीख पासून सुरु करण्यात येणारआहेत.
सध्या राज्यामध्ये मुंबई मध्ये अधिक प्रमाणात बाधितांची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे जरी राज्यात मास्क बंधनकारक केला नसला तरी, सुद्धा स्व संरक्षणासाठी तरी ‘राज्यात मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र, मास्क वापरणं बंधनकारक नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोना परिस्थितीचा आढाव घेत शाळेसंदर्भात निर्णय घेतला जाईल. तसेच आज पार पडणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना परिस्थितीचा आढाव घेतला जाणार आहे. त्यानंतर शाळा सुरू करण्यापूर्वी आम्ही चाइल्ड टास्क फोर्स तसेच आरोग्य विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं त्या म्हणाल्या.’
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. मंत्रालयात दुपारी ४ वाजता बैठक पार पडणार असून वाढत्या कोरोनावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील इतर मुद्द्यावरही चर्चा होऊ शकते. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे याबाबतही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.