दिवाळी सुट्टीमुळे कोकणात अनेक पर्यटक दाखल झाले असून, विविध तालुक्यातील बीच पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. मासळी खरेदी, समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे येथील कोरोना काळात ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेलाही चांगलीच गती प्राप्त झाली आहे. किनाऱ्यावरील व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, वॉटर स्पोर्टसमुळे येथील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. थंडीचा गारवाही वाढू लागल्याने पर्यटकांची पावले कोकणातील विविध बीचकडे वळू लागली आहेत.
कोकणातील विविध समुद्र किनारे, दापोली, गणपतीपुळे, आरेवारे, गणेशगुळे, गुहागर, मालवण, वेंगुर्ला अशा ठिकाणांना पर्यटकांची प्रथम पसंती आहे. त्यामुळे सलगच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी नियोजन करत पर्यटक फिरत आहेत. यात समुद्र किनारे, किल्ले, मंदिर अशा ठिकाणी पर्यटकांचा ओघ आहे. त्यामुळे कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले आहेत.
सलग सुट्ट्यांमुळे मौज मज्जा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची एकच गर्दी होत आहे. मालवण जेटी, चिवला समुद्र किनारा, रॉक गार्डन, तारकर्ली, देवबागसह सिंधुदुर्गमधील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. जलक्रीडा पर्यटनाचाही पर्यटक आनंद लुटत आहेत. मात्र वाढत्या पर्यटकांमुळे, वाहतुकीची मात्र कोंडी होत आहे.
येवा कोकण आपलेच असाचा प्रत्यय कोकणात दाखल होणारे पर्यटक अनुभवत आहेत. पर्यटक वाढल्याने अनेक समुद्र किनारी सुरक्षा रक्षकांची वाढ करण्यात आल्याने, सुरक्षित पर्यटन देखील सर्वांनी अनुभवलं. मात्र वाहतूक कोंडीचा मनस्ताप पर्यटकांसह स्थानिकांना देखील सहन करावा लागत आहे. मुंबई, ठाणे, नाशिक येथील पर्यटक सध्या कोकणातील पर्यटन स्थळांना पसंती देत आहेत. त्यामुळे पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर गर्दी करू लागले आहेत.