काळबादेवी येथून जाणाऱ्या सागरी महामार्गाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत मिऱ्या ते काळबादेवी पुलाला जोडून उड्डाण पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पूल थेट नवानगर-पाथरदेव येथे जोडण्यात येणार असून, पुढील मार्ग बसणीतून आरे-वारेला जोडण्यात येणार आहे. याबाबत आठ दिवसात जागेची अंतिम मोजणी करण्यात येणार आशासकीय विश्रामगृहात बैठक झाली. हे प्रस्तावित सागरी महामार्गाच्या आराखड्याबाबत १ जूनला पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीला एमएसआरडीसीचे अधिकारी आणि काळबादेवी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. सागरी महामार्ग समुद्रालगत जावा, अशी येथील स्थानिक ग्रामस्थांची मागणी होती. ग्रामस्थांच्या आक्रमक पाठपुराव्यामुळे समुद्रमार्गे सागरी महामार्ग होण्यासाठी एमएसआरडीसीमार्फत सर्वेक्षण देखील करण्यात आले; मात्र या मार्गावर असलेल्या वनखात्याच्या सुरूबनामुळे समुद्रमार्गे सागरी महामार्ग नेण्यावर बंधने आली.
वनखात्याने सुरूबन तोडून सागरी महामार्गाला नकार दिल्याचे रविवारी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. बैठकीत मिऱ्या-काळबादेवी खाडीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाला जोडूनच उड्डाण पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’च्या उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. हा पूल उभारताना काळबादेवी येथील एकाही घराला धक्का लागणार नाही, याची काळजी घेतली जाईल. समुद्रमार्गे न नेता हा ब्रीज थेट नवानगर-पाथरदेव येथे मुख्य मार्गाला जोडण्यात येणार आहे. सध्याच्या रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरील बसणी रस्त्याला हा सागरी महामार्ग जोडण्यात येणार आहे. पुढील आठ दिवसात बसणीमार्गे जाणाऱ्या सागरी महामार्गासाठी अंतिम जागा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली; मात्र बसणी येथून महामार्ग नेमका कसा जाणार याबाबत मात्र अनिश्चितता आहे.