जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करण्याऐवजी या समितीचे उत्पन्न कसे वाढेल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी मी काही उपाययोजना सरकारला सुचवल्या आहेत, अशी माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली. ज्या त्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला त्याच तालुक्यात बाजारपेठ मिळावी, या चांगल्या उद्देशाने प्रत्येक तालुक्यासाठी बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला असला तरी अंमलबजावणीच्या पातळीवर संभ्रमावस्था आहे. रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन झाले; पण त्याची अंमलबजावणी कधीपासून, नोकरभरती करायची की, आहे त्या कर्मचाऱ्यांचे विभाजन करायचे यांसारख्या अनेक गोष्टींबाबत स्पष्टता नाही. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, नव्याने बाजार समित्या स्थापन होणार आहेत. त्याला आमचा विरोध नाही. रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात जिल्ह्यातील ९ तालुके येतात. हे तालुका विखुरलेले आहेत. तिथेपर्यंत माल पोहोचवणे खर्चिक होते.
त्यातून शेतकरी दलालाच्या विळख्यात सापडला होता. कमी दरात दलाल शेतमाल खरेदी करून तो जादा दराने विकत होते. त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा नव्हता. यावर मार्ग काढण्यासाठी राज्यातील मोठ्या बाजार समित्यांचे विभाजन करून ज्या ६५ तालुक्यांत समित्या नव्हत्या त्या ठिकाणी नव्याने स्थापन करण्यात आल्या. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने ८ समित्या स्थापन होणार आहेत. सध्या बाजार समितीला शासनाकडून कोणत्याही स्वरूपाचे अनुदान मिळत नाही. त्यामुळे येणाऱ्या उत्पन्नातूनच बाजार समित्यांना कर्मचाऱ्यांचे पगार, आवारातील सोयीसुविधा उभ्या कराव्या लागतात. याउलट उत्पन्नातील काही रक्कम कर म्हणून शासनाला द्यावी लागते. नव्या बाजार समित्यांना शासनाकडून अनुदान मिळणार की नाही, याविषयी अध्यादेशात स्पष्टता नाही. त्यामुळे नव्याने बाजार समित्या स्थापन न करता आहे त्या बाजार समितीचे उत्पन्न कसे वाढेल, तिचा तोटा कमी कसा करता येईल याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे, अशी माझी मागणी आहे. त्या संदर्भात मी सरकारकडे पत्रव्यवहार केल्याचे आमदार निकम यांनी सांगितले.
अनेक प्रश्न अनुत्तरित – या संदर्भात राज्यशासनाने काढलेल्या अध्यादेशात या बाजार समित्या कधीपासून अस्तित्त्वात येणार याची माहिती नाही. बाजार समितीसाठी किमान १५ ते २० एकर जागा आवश्यक आहे. तालुक्याच्या ठिकाणी अशी सरकारी जागा मिळेल का? या विषयी संभ्रमावस्था आहे. नव्या बाजार समित्यांचा कर्मचारी आकृतिबंध कसा असेल ? सध्या कार्यरत कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणी पाठवायचे की, नवे कर्मचारी घ्यावे लागणार, या विषयीही स्पष्टता नाही.