बेशिस्त पद्धतीने होणारी वाहतूक आणि सामोर्या जाव्या लागणाऱ्या अपघाताना टाळण्यासाठी महाराष्ट्रातील ट्राफिक पोलिसांना बॉडी-वॉर्न कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. काही वेळा वाहतूक पोलिसांकडून विनाकारण अडवणूक करून पैशांची मागणी केली जाते, अशा स्वरूपाच्या तक्रारींत वाढ झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आता वाहतूक पोलिसांकडील बॉडी-वॉर्न कॅमेऱ्याच्या मदतीने वाहनचालक व वाहतूक पोलिसांमधील आरोप- प्रत्यारोपातील सत्यता पडताळता येणार आहे. ३२ जीबी रेकॉर्डिंग साठवण क्षमता असलेल्या बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यात ऑडिओ व व्हिडिओदेखील रेकॉर्ड होणार आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या पुढाकारातून मागील वर्षी या बॉडी वॉर्न कॅमेऱ्याची ट्रायल घेण्यात आली होती.
बेशिस्त वाहन चालकांवरील कारवाई दरम्यान त्या कॅमेऱ्याचा मोठा फायदा होतो, ही बाब अधोरेखित झाली. त्यानंतर पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी गुरुवारी ५० वाहतूक पोलिसांना ते कॅमेरे देण्याचा निर्णय घेतला. आता ते कॅमेरे वाहतूक पोलिसांच्या खिशावर लावले जाणार आहेत. बॉडी कॅमेरा लावलाच नसेल तर?
काहीवेळा चुकीच्या पद्धतीनेही कारवाई केली जाते. त्याची सत्यता आता बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यातून स्पष्ट होणार आहे. मात्र, कारवाई करताना एखाद्या वाहतूक पोलिसाने तो कॅमेराच लावला नसेल आणि समोरील व्यक्तीकडून आरोप-प्रत्यारोप झाला तर काय, या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तरीत आहे. राज्यात अनेक ठिकाणी ट्रायल घेऊन हळूहळू सगळीकडे हि यंत्रणा कार्यान्वित करण्याचा विचार शासन करत आहे. जेणेकरून वाहतूक पोलीस आणि नियमभंग करणाऱ्या लोकांवर सुद्धा नियंत्रण राहील.