सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर आता रोज विमान सेवा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे विमानांची सुद्धा वर्दळ आता दिसू लागली आहे. यामध्येच काल धावपट्टीवर अचानक आलेल्या कोल्ह्यामुळे यंत्रणेची तारंबळ उडाल्याची घटना नुकतीच घडली. मुंबईवरून आलेल्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यासाठी कोल्ह्याला धावपट्टीवरून दूर करेपर्यंत दहा मिनिटे अवकाशात घिरट्या घालण्याची वेळ ओढावली.
या घटनेमुळं नव्यानं सुरु करण्यात आलेल्या या विमानतळावर दहा मिनिटांसाठी लॅन्डिंग थांबविण्यात आले होते, पण त्यामुळे प्रवाशांमध्ये मात्र संभ्रम आणि भीती निर्माण झाली. विमान उतरताना पुन्हा हवेत झेपावले त्यामुळे प्रवाशांच्या अनेक विचार डोक्यात येऊन गेले. सिंधुदुर्ग चिपी विमानतळ सुरु झाल्यानंतर या विमानतळावर असा एक प्रसंग आला की, मुंबईवरून आलेल्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यासाठी दहा मिनिटे अवकाशातच फेर्या मारत राहण्याची वेळ आली.
मुंबईहून येणारे विमान उतरवताना धावपट्टीवर कोल्हा असल्याचे विमानाच्या पायलटला समजले. त्यामुळे त्यांनी वेळेमध्ये विमान पुन्हा आकाशात झेपावले आणि संबंधित सुरक्षा यंत्रणेला या कोल्ह्याला धावपट्टीवरून हटवण्यास सांगितले. सुरक्षा यंत्रणेने या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढल्यानंतर दहा मिनिटांनी हे विमान धावपट्टीवर उतरविण्यात आले. यामुळे प्रवाशांमध्ये सुरुवातीला निर्माण झालेली भीती नष्ट झाली परंतु त्या कालावधीमध्ये मात्र या प्रकारावरुन अनेक गजाली रंगल्याचे चित्र पहायला मिळाले.
सिंधुदुर्ग विमानतळाच्या आजूबाजूला परिसरामध्ये कोल्ह्यांचा कळपाचा वावर आहे आणि हे कोल्हे भूकेमुळे शिकारीच्या शोधात फिरत असतात. दरम्यान विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर या विमानतळावर पहिल्याच वेळी कोल्ह्याचे दर्शन झाले आहे. विमानसेवा सुरु झाल्यानंतर काही दिवसांनी या धावपट्टीवर कोल्ह्यांचा वावर दिसायला लागला आहे.