गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुसह्य होणार आहे. चाकरमान्यांना कमी वेळेत आपल्या गावी पोहोचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी पुढाकार घेत गणपतीत समुद्रमार्गे प्रवास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता मुंबईतून साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग तर ३ तासांत रत्नागिरी गाठता येणार आहे. या जलवाहतूकीची जय्यत तयारी सुरू झाली असून त्यासाठी लागणारी एम टू एम बोट २५ मे ला मुंबईतील भाऊचा धक्का येथे दाखल होणार आहे. मुंबईतील माजगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार असल्याची मोठी घोषणा मत्स्य व बंदरे विकासमंत्री ना. नितेश राणे यांनी केली आहे. हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत आता कोकणात प्रवास करता येणार आहे. त्यामुळे चाकरमन्यांसाठी ही आनंदाची बातमी असून दरवर्षी होणाऱ्या प्रवासासंदर्भातील त्रासापासून काही अंशी सुटका होणार आहे.
२५ मे ला भाऊच्या धक्क्यावर – गणेशोत्सवासाठी कोकणात जाताना चाकरमान्यांना रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडीने होणारी परवड आणि वेळखाऊ प्रवास, हा त्रास नेहमीचाच झाला आहे. आता या त्रासातून दिलासा देण्यासाठी मत्स्य व बंदरे विभागाकडून मुंबईतील माजगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. याकरिता एम टू एम बोट वापरली जाणार असून, येत्या २५ मे रोजी ती मुंबईतील भाऊचा धक्का येथे दाखल होणार आहे. मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून परवडणाऱ्या दरात जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे.
अवघ्या ३ तासांत रत्नागिरी – याकरिता एम टू एम ही बोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे प्रयोजन आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत पुन्हा एकदा जलवाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मुंबईतील माजगाव डॉक येथून प्रवास सुरू होईल. जवळपास साडेचार तासांत कोकणातील मालवण, विजयदुर्ग तर ३ तासांत रत्नागिरीपर्यंत पोहोचता येईल. लवकरच चाकरम ान्यांना परवडतील असे दर यासाठी निश्चित केले जाणार आहेत.