रत्नागिरी तालुक्यातील अनेक कलाकारांच्या, मूर्तीकार गणपती कारखान्यात हरतऱ्हेच्या गणेशमूर्ती आत्तापासूनच आकार घेऊ लागल्या आहेत. गणेशोत्सवासाठी जेमतेम १ महिन्यांचा अवधी राहिला असून, गणेशमूर्ती शाळामध्ये लगबग दिसू लागली आहे. गेल्या ४-५ दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरी भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी भरत असल्याचे प्रकार घडून येत आहे.
तालुक्यात साधारण हजारच्या दरम्यान गणपती बनविण्याचे कारखाने लहान मोठे कारखाने आहेत. दरवर्षी सर्व कारखान्यामध्ये गणेश मूर्ती घडविण्याच्या कामाला याच दरम्यान सुरुवात केली जाते. रत्नागिरी शहरातील घुडेवठार भागात असलेल्या विलणकर यांच्या चित्रशाळेतील गणेशमूर्तीं बनवण्याचे काम सुरू होते, त्याठिकाणी अनेक प्रकारच्या विविध गणेश मूर्ती बनवण्यात आल्या आहेत, काल पडलेल्या अतोनात पावसामुळे या भागात नगरपरिषदेची गटाराचे व्यवस्थापन नीट नसल्याने, पावसाचे पाणी संपूर्ण परिसरात शिरल्याने गणेशमूर्ती ठेवलेल्या चित्र शाळेतही पाणी शिरले. त्यामुळे मूर्तीना धक्का बसतो कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
रत्नागिरीतील बहुतांशी मूर्तीकार शाडूच्या मातीपासूनच मूर्ती तयार करतात.गणेशमूर्तीसाठी लागणाऱ्या शाडूच्या मातीतून लाखो रूपयांची उलाढाल होते. हि माती कारखानदार मे महिन्याच्या अखेरीस खरेदी करून मूर्तीकामाला प्रारंभ करतात. जेणेकरून, मूर्ती व्यवस्थित सुकून, रंगकाम, रेखणी, हल्ली केली जाणारी हिऱ्यांची सजावट वेळेत पूर्ण होईल. गेल्यावर्षीच्या तुलनेत मूर्तीच्या किंमतीमध्ये थोडी वाढ करण्यात येणार आहे. पण पावसाच्या मुसळधार कोसळण्याने, गणपती कारखान्यामध्ये पाणी शिरल्याने गणेशमूर्ती घडविण्याच्या कामामध्ये व्यत्यय येत आहे. तरीसुद्धा रत्नागिरीमधील कारागीर दिवसरात्र गणपतीच्या कामांमध्ये गुंतून गेले असल्याचे दिसत आहे.