HomeRatnagiriलांज्यातील कचरा शेजारील गावांच्या माथी...

लांज्यातील कचरा शेजारील गावांच्या माथी…

खेरवसे गावाच्या हद्दीमधील ढववाडी येथील एका जागेत टाकला जात आहे.

लांजा शहराच्या घनकचरा प्रकल्पावरून नागरिक आणि नगरपंचायत प्रशासनामध्ये खडाजंगी सुरू आहे. तीन ठिकाणच्या जागांना विरोध उठल्यानंतर अखेर लांजा नगरपंचायतीकडून शहराचा कचरा तीन किमीवर असणाऱ्या खेरवसे गावात आणून टाकला जात आहे; मात्र आमच्या गावाच्या हद्दीत लांजा शहरातील कचरा टाकू नये, असा पवित्रा घेत खेरवसे गावच्या नागरिकांसह बेनीखुर्द-खेरवसे ग्रामपंचायतीने कडाडून विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन ग्रुपग्रामपंचायत बेनीखुर्द-खेरवसे यांनी तहसीलदारांना दिले आहे. त्यामुळे जागेअभावी शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नगरपंचायत हद्दीत दररोज सुमारे तीन टन कचरा जमा केला जातो. त्यामुळे शहरातील कचऱ्याच्य व्यवस्थापनासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच नगरपंचायतीने कचरा खेरवसे गावात टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे नगरपंचायतीच्या या मनमानी कारभाराविरोधात बेनीखुर्द-खेरवसे ग्रामपंचायतीने नाराजी दर्शवत विरोधाची भूमिका घेतली आहे. कचरा टाकण्याबाबत खेरवसे गावच्या ग्रामस्थ व ग्रामपंचायतीला कोणतीच पूर्वसूचना अथवा माहिती न देता शहराचा घनकचरा खेरवसे गावच्या हद्दीमधील जागेत आणून टाकत आहेत. ग्रामपंचायतीने ग्राम ठराव करून या निर्णयाला विरोध केला आहे.

धुंदरे, कोत्रेवाडी, कुवेनंतर खेरवसेतही विरोध – शहराच्या डंपिंग ग्राउंडसाठी नगरपंचायतीकडून सुरुवातीला शहराजवळील धुंदरे गावात जागा निश्चित करण्यात येत असतानाच धुंदरेमधून नागरिकांचा तीव्र विरोध झाला. त्यानंतर शहरातील कोत्रेवाडी येथे जागा निश्चित करण्यात आली; मात्र येथील जागेलाही सध्या कडाडून विरोध होत असून, नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. कुवे येथील जागा निश्चितीबाबत हालचाली सुरू असतानाच स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवल्याने कुवेमधील जागेवर नगरपंचायतीने घनकचरा टाकणे बंद केले आहे.

कचरा दुसऱ्या गावांच्या माथी मारू नका – लांजा नगरपंचायतीने खेरवसे येथे घनकचऱ्यासाठी नियोजित केलेल्या जागेला ग्रामस्थांचा विरोध होत असल्याने पुन्हा डंपिंग ग्राउंड जागेबाबत नगरपंचायतीसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहराच्या घनकचऱ्यासाठी जागा उपलब्ध होणे तितकेच महत्त्वाचे आहे; मात्र शहरातील कचरा शेजारील गावांच्या माथी न मारण्याची जोरदार मागणी होऊ लागली आहे.

कचऱ्यामुळे दुर्गंधी, आरोग्याची समस्या – लांजा शहरातील घनकचरा खेरवसे गावाच्या हद्दीमधील ढववाडी येथील एका जागेत टाकला जात आहे. लोकवस्तीजवळ हा शहराचा घनकचरा टाकला जात असून, मोठ्या प्रमाणत दुर्गंधी पसरून नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होणार आहे. श्वान व रानटी प्राणी हा कचरा अस्ताव्यस्त करत असून, त्याचा लोकवस्तीला त्रास होत आहे. त्यामुळे लांजा शहरातील घनकचरा खेरवसे गावच्या हद्दीमध्ये टाकण्यात येऊ नये, असे निवेदन ग्रामपंचायतीने तहसीलदारांना दिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular