मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाली जवळील चरवेली ते कापडगावदरम्यान गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास धावत्या टँकरमधून अचानक वायूची गळती सुरू झाली. सुदैवाने या परिसरात त्यावेळी कोणीही नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला. याचदरम्यान मागून येणाऱ्या काही वाहनचालकांच्या ही बाब निदर्शनास आली आणि त्यांनी प्रसंगावधान राखून टँकरचालकाला याबाबत माहिती देताच टँकर थांबविण्यात आला. सुरू असलेली वायूगळती थांबविण्यात यश आले. अनर्थ टळला. मात्र या वायूगळतीची जोरदार चर्चा त्यानंतर पाली, हातखंबा, निवळी, जयगड आदी परिसरात सुरू होती. याबाबत अधिक वृत्त असे की, मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना या टँकरच्या टाकीमधील तापमान वाढल्याने गॅसचा दाब प्रचंड वाढला. त्यामुळे टाकीच्या वरील बाजूस असलेल्या पाईपमधून गॅस ओव्हरफ्लो होऊन बाहेर येऊ लागला. चालत्या टँकरमधून गॅस बाहेर येत असल्याचे मागून येणाऱ्या काही वाहनचालकांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ टँकरचालकाला याबाबत सांगितले. चालकाने त्वरित टँकर रस्त्याच्या कडेला थांबवला. जवळपास अर्ध्या तासाने टाकीमधील गॅसचा दाब कमी झाल्यावर गळती थांबली.
पोलीस घटनास्थळी – दरम्यान यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गॅसचा वास पसरला होता, पण सुदैवाने या भागात मानवी वस्ती नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि पाली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती हाताळून सुरक्षिततेची उपाययोजना केली. तसेच, महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली.
उष्णतेमुळे घडला प्रकार – या घटनेनंतर संबंधित गॅस वाहतूक कंपनीच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यांनी सांगितले की, उष्णतेमुळे टाकीमधील गॅसचे तापमान वाढल्याने हा प्रकार घडला. यानंतर त्यांनी टँकरवर थंड पाणी मारून तापमान कमी करण्याचा उपाय करण्यात आला. त्यानंतर टँकर पुढे मार्गस्थ झाला.