कोरोना काळानंतर आता परिस्थिती आटोक्यात आली असून, पूर्वी प्रमाणे रेल्वे सेवा सुरु झाली आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये प्रवासाला आळा बसावा, त्याचप्रमाणे संसर्ग कमी व्हावा यासाठी जे तिकीट दर वाढविण्यात आले होते ते सुद्धा आत्ता पूर्वीप्रमाणे कमी करण्यात आले आहेत. परंतु, जिथे रेल्वे सुरु झाल्या तिथे त्यामध्ये घडणारे गुन्हे सुद्धा पुन्हा घडायला सुरुवात झाली आहे.
एका महिलेचे ओखा एक्स्प्रेसमधून प्रवासादरम्यान चोरट्याने दागिने पळवले. हा प्रकार पहाटे पावणे पाचच्या सुमारास रत्नागिरी स्थानकाजवळ घडला. अनेक महिला दागिने किंवा काही किमती ऐवज प्रवास करताना पर्समध्ये काढून ठेवतात. यांचे सुमारे पाच लाख २७ हजार ५०० रुपयांचे दागिने आणि काही रोख रक्कम होती. याबाबत येथील पोलिस ठाण्यामध्ये त्यांनी तक्रार दिली आहे.
गेल्या दोन वर्षांनंतर रेल्वेतील हा चोरीचा मोठा प्रकार समोर आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिला प्रभाकर तळेकर आणि त्यांचे भाऊ शिवराम दत्ताराम सावंत ओखा एक्स्प्रेसने कणकवलीकडे जात होते. श्रीम. तळेकर वसई रेल्वे स्थानकामध्ये गाडीमध्ये बसल्या, तर भाऊ सावंत पनवेल रेल्वे स्थानकांमध्ये एस चार बोगीमध्ये बसले होते.
पहाटे पावणे पाचच्या सुमारास ओखा एक्स्प्रेस रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ आली असता, संशयित श्रीम. तळेकर यांच्या सीट जवळ आला. आणि गाडी स्लो झाल्यानंतर त्याने तळेकर यांच्या खांद्यावरील पर्स खेचली आणि रेल्वेमधून उडी मारून पाल काढला. श्रीम. तळेकर यांनी त्वरितच त्याचा पाठलाग केला, पण संशयित चोरटा गाडीतून उडी मारून पसार झाला. त्यामुळे श्रीम. तळेकर यांनी पोलीस स्थानकात या चोरीची तक्रार नोंदवली.