प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी १४ मार्च २०२२ रोजी दिलेल्या हवामान विषयक पूर्व सूचनेमध्ये जिल्ह्यात आठवडाभर तापमानात मोठ्या प्रमणात वाढ होणार असून या दिवसांत जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शासनाने उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
अति प्रमाणात वाढलेल्या उष्णतेमुळे उष्माघाताची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांमुळे जर अशी लक्षणे जाणवली जसे भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, डोके दुखणे रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी आहेत. सदरची लक्षणे आढळल्यास उपचार म्हणून रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे. कुलर ठेवावेत, वातानुकुलित खोलीत ठेवावे. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅड लावावेत आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने शीरेवाटे सलाईन देणे आदी गोष्टी कराव्यात.
उष्माघातामध्ये तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी अथवा पाणीदार फळे, ज्यूस प्यावे. सुटसुटीत आणि सच्छिद्र सूती कपडे वापरावेत. उन्हाच्या भरात बाहेर जायची वेळ आलीच तर गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलांचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत बाळगावी. उन्हामध्ये काम करत असलेल्या व्यक्तीनी डोक्यावर टोपी किवा छत्रीचा वापर करावा जेणेकरून सूर्याची अति उष्ण किरणे थेट शरीरावर पडणार नाहीत. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा नियमित वापर करावा.
गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, व सनशेडचा वापर करावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचे कामगारांना सूचित करावे. पहाटेच्यावेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. गरोदर महिला, कामगार व आजारी कामगारांनी या उष्म्याच्या काळात अधिक काळजी घ्यावी.
उष्माघातामध्ये पुढील गोष्टी करु नयेत. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नयेत. दुपारी १२ ते ३.३० या प्रखर उन्हाच्या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीच्या आधी स्वयंपाक करून घ्यावा तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची रचना हवेशीर असावी.