चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत ओळखपत्र व इतर कागदपत्रे नसल्याने शासनाच्या विविध योजनांपासून वंचित असलेल्या कातकरी कुटुंबांसाठी आकले येथे ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी आदिम कातकरी संघटना व तहसीलदारांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. चिपळूण तालुक्यातील अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षे आदिवासी कातकरी समाज वास्तव्य करत आहे; मात्र यातील बहुतांश नागरिकांकडे स्वतःच्या ओळखीचा कोणताही पुरावा नाही.
जातीचा दाखला नाही तसेच रेशनकार्डही नाही. कागदपत्रांच्या अभावामुळे शासनाच्या अनेक योजना असूनही कोणत्याही योजनेचा लाभ या नागरिकांना मिळत नाही. परिणामी, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य अशा मूलभूत गरजाही या आदिवासी समाजाच्या पूर्ण होत नाहीत. याचा विचार करून आदिवासी आदिम कातकरी संघटना व तहसीलदारांनी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आदिवासी कातकरी नागरिकांना वेगवेगळ्या कागदपत्रांचे वितरण केले.
यामध्ये नवीन आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, आरोग्य तपासणी दाखले व संजय गांधी निराधार योजनेंतर्गत फॉर्म भरून घेण्यात आले. या वेळी आदिवासी आदिम कातकरी संघटनेचे जिल्हा सचिव चंद्रकांत जाधव, चिपळूण तालुकाध्यक्ष संजय जगताप, खजिनदार गोपी निकम, कृषी अधिकारी मनोज गांधी, मंडळ अधिकारी संदेश आयरे, आकले गावचे सरपंच नीतेश निकम आदी उपस्थित होते.