जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा पार पडली. सभेला उपाध्यक्ष उदय बने यांच्यासह सर्व विषय समिती सभापती आणि सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड उपस्थित होत्या. रूग्णांना वेळीच उपचार मिळावेत, यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात १०८ रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु चुकीच्या पद्धतीने नियोजन होत असल्यामुळे गरजेच्या वेळी रूग्णांना त्या वेळेत उपलब्ध होत नाही. हा प्रकार सदस्यांच्या लक्षात आला होता.
ग्रामीण भागामध्ये कित्येक वेळा वेळेत रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी वाहनाची उपलब्धता नसल्याने, रुग्ण दगावतात. त्यासाठी प्रत्येकाला वेळेत उपचार मिळावे यासाठी शासनाकडून १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकेची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु, या सुविधेचा खरचं गरजू रुग्णांना उपयोग होतो का? हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्यावर स्थायी समितीच्या सभेत चर्चा झाली.
शासनाकडून दिलेल्या १०८ रूग्णवाहिकांचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. संबंधित व्यवस्थापकावर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली आहे. कोरोना काळातसुद्धा या क्रमांकावर फोन केला असता, चालकांकडून तुम्ही आधी रुग्णालयात बेड बुक करा, मिळत असेल तर मग फोन करा. अशा प्रकारची उत्तरे देण्यात येत असल्याने नक्की १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकेचा वापर कोणासाठी आहे! असा सर्व सामान्यांना प्रश्न पडत आहे. अशा अनेक तक्रारी या संदर्भात आल्याने यावर नियोजन असणार्या व्यवस्थापकांवर संबंधित विभागाने कारवाई करावी अशा सूचना अध्यक्षांनी दिल्या आहेत.