गेले काही दिवस वादाचा विषय बनलेल्या टोल प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून अनेक ठिकाणी मनसे स्टाईल आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमिवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी सरकारने ४४ टोल बंद होतील याप्रमुख आश्वासनासह एकूण १४ आश्वासने ठाकरे यांना दिली असल्याचे वृत्त आहे. या भेटीनंतर राजठाकरे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, ‘मी ९ वर्षांपूर्वी टोलप्रश्री सरकारसोबत चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे गेलो होतो.
तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की, टोलबाबत जो करार झाला आहे तो २०२६ पर्यंत आहे. मात्र या करारात जे बदल केले जाणं गरजेचं होतं, ते अद्याप झालेले नाहीत. मुंबईच्या वेशीवर टोल दरवाढ झाल्यानंतर आता हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता सरकारने मला काही आश्वासने दिली असून ती पूर्ण करण्यासाठी १ महिन्याची मुदत मागितली आहे,’ असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर शुक्रवारी ना. दादा भूसे यांनी राज ठाकरेंच्या निवास स्थानी जाडून सरकारची भूमीका आणि करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत भूमिका स्पष्ट केली.
सरकारकडून राज ठाकरेंना कोणती आश्वासने? – एंट्री पॉइंटवर पुढील १५ दिवस वाहने मोजण्यासाठी सरकारकडून कॅम रे बसवण्यात येणार. सरकारसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही असे कॅमेरे लावणार. करारात नमूद केलेल्या सर्व सोईसुविधा, यामध्ये स्वच्छ प्रथोमोपचारसाठी लागणारी सेवा, एक रुग्णवाहिका, प्रकाशयंत्रणा करावी लागणार. स्वच्छतागृह, तक्रार देण्यासाठी मंत्रालयात एक यंत्रणा तयार केली जाईल. टोलनाक्यांवर काय समस्या जाणवत आहेत, त्या नोंदवण्यासाठी एक मोबाइल नंबर दिला जाईल. करारातील सर्व उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटीकडून केलं जाईल.
ठाण्यात जी टोल दरवाढ झाली आहे, ती रद्द करण्यासाठी सरकारने एक महिन्याचा अवधी मागितला आहे. प्रत्येक टोलनाक्यावर पूर्वी जी यलो लाइन होती, ती पुन्हा सुरू केली जाईल. या यलो लाइनच्या बाहेर रांग गेल्यानंतर रांग कमी होण्यापर्यंत सर्व गाड्या टोल न घेता सोडल्या जातील. टोलनाक्यावर फास्टटॅग चालला नाही, तर तुम्हाला एकदाच पैसे भरावे लागणार. पुन्हा मोबाइलवर पैशांसाठी मेसेज आल्यास तक्रार नोंदवता येणार. टोलसाठी किती रुपयांचे टेंडर आहे, आतापर्यंत किती पैसे वसूल झाले आणि अजून किती पैसे जमा होणं बाकी आहे, याची माहिती देणारा टोलनाक्यावर मोठा बोर्ड लावला जाईल. आनंदनगर किंवा ऐरोली अशा एकाच ठिकाणी टोल भरावा लागणार.
मुलुंडच्या हरीओमनगरमधील रहिवाशांसाठी मुलुंड म्हाडा कॉलनीम धून पूल बांधला जाईल. केंद्राच्या अखत्यारितील रस्ते खराब असतील तर तो टोल बंद करण्याचा नियम आहे. याबाबतही पुढील १५ दिवसांत राज्य सरकार हे केंद्र सरकारशी बोलून कार्यवाही करेल. सार्वजनिक बांधकाम विभागाचे २९ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे १५ जुने टोल बंद करण्यासंदर्भात पुढील १५ दिवसांत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मुंबई एंट्री पॉइंट, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राजीव गांधी सीलिंक याचे का ऑडिट केले जाईल. अवजड वाहने अनेकदा लेनची शिस्त पाळत नाहीत. सरकार पुढील महिनाभरात अवजड वाहनांना शिस्त लावेल, असा शब्द मला दादा भुसे यांनी दिला आहे, असे राज ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.