राज्यभरात राज्यपालांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ संताप व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात निदर्शने केली, तर राज्यपालांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी औरंगाबादच्या संभाजी ब्रिगेडने केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी राज्यपालांची उचलबांगडी करावी, त्यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणी केली.
त्या वक्तव्यावर अखेर राज्यपालांनी स्पष्टीकरण दिले आहे, त्यामध्ये ते म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्राचे प्रेरणास्रोत आहेत. मला जेवढी माहिती होती, त्यांच्या संदर्भात मी प्रारंभीच्या दिवसांमध्ये जे काही वाचलं होतं, त्यातून मला कळलं होतं की, समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत. मात्र, इतिहासातील काही नवीन वास्तव मला लोकांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढे ते मी पाहीन, असे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जळगावात या विषयावरील वादावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला.
समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नसल्याचे पुरावे राज्य शासनाच्या वतीने एका खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केले होते. सन २००८ मधील या खटल्याचा निकाल देताना संवेदनशील विषय सादर करून अशी विचारधारा विद्यार्थ्यांवर लादण्याचा प्रयत्न केला जाऊ नये, असेही खंडपीठाने त्या वेळी स्पष्ट केले होते.
रविवारी औरंगाबादच्या एका कार्यक्रमात कोश्यारी यांनी समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते, असे विधान केले होते. त्यानंतर राज्यभर अनेकांनी त्यांच्या या वक्तव्याबद्दल निषेध नोंदवत प्रतिक्रिया दिली होती. सोमवारी जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी राज्यपाल उपस्थित होते. तेंव्हा परतताना त्यांना पत्रकारांनी घेराव घातला आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याची शहानिशा करत प्रश्नांची सरबत्ती केली. अनेक पक्षांनी आणि संस्थांनी माफी मागण्याच्या मागणी संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला, मात्र त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.