चिपळूण शहरामध्ये वारंवार होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीची समस्या लक्षात घेता, गुहागर मार्गावरील पागमळा ते उक्ताड असा गुहागर बायपास रस्ता तयार करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याच्या बांधणीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु अनेक वर्षात या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरीकरणासाठी वेळीच योग्य ती पावले न उचलल्याने त्याची पुर्णतः दुरावस्था झाली आहे.
गेल्या दहा वर्षात गुहागर बायपासच्या खड्ड्यातून नियमित प्रवास करून अनेकांना शारीरिक अवस्था बेजार झाली आहे. बायपास मार्गावरील खड्डे भरणे तसेच डांबरीकरणासाठी अनेकांनी आंदोलने आणि उपोषणे केली तरी रस्त्याची अवस्था जैसे थेच होती. मात्र आता या रस्त्याची मलमपट्टी होणार असून अखेर खड्ड्यातून मुक्तता होणार आहे. या रस्त्यासाठी मंजूर ५ कोटीच्या निधीतून डांबरीकरण व अन्य कामांची सुरूवात झाली आहे. परिणामी येथील प्रवास लवकरच वेदनारहित होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाने सादर केलेल्या ७५ कोटीच्या ड्रीम प्रोजेक्टवरही केंद्र शासन लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. रस्त्यापेक्षा खड्डे अधिक अशी भयानक परिस्थीती या मार्गाची बनली आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अनेकदा आंदोलनाची भूमिका राजकीय पक्षांकडून घेण्यात आली. परंतू तात्पुरत्या डागडुजी व्यतिरिक्त कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे गुहागर बायपास रस्ता चिपळूणकरांसाठी डोकेदुखी बनला आहे.
या रस्त्याविषयी आमदार भास्कर जाधव यांनीही लक्ष केंद्रीत केले होते. त्यांच्या प्रयत्नातून रस्ता डांबरीकरणासाठी ५ कोटीचा निधी मिळाला. निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर पावसाळा संपताच डांबरीकरणाचे काम होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देखरेख ठेवण्यात आली आहे.