यंदा रत्नागिरी हापूस बाजारात येण्यास गतवर्षीच्या तुलनेत उशीर झाला आहे. त्यामुळे हंगामातील मुहूर्ताच्या हापूसला सोन्याचा दर मिळत आहे. राजापूर तालुक्यातून वाशी बाजारात पाठविलेल्या तीन पेट्यांमधील हापूस आंब्याला डझनाला १५०० ते २५०० रुपये दर मिळाला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार सुखावला आहे. फेब्रुवारी महिन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वाशी बाजारात केवळ २० टक्केच आंबा दाखल झाला आहे. त्यातील सर्वाधिक पेट्या देवगडमधील हापूसच्या आहेत, असे तेथील व्यावसायिकांनी सांगितले. राजापूर तालुक्यातील आंबा बागायदार गजानन शेट्ये यांच्या बागेतील हापूस आंब्यांच्या तीन पेट्या वाशी मार्केटमध्ये काल (ता. १६) दाखल झाल्या.
उर्वरित मालही टप्प्याटप्प्याने बाजारात पाठविण्यात येणार आहे, असे बागायतदार मंदार शेट्ये यांनी सांगितले. पहिल्या टप्यात आलेला मोहोर टिकून राहावा, यासाठी योग्य व्यवस्थापन करत झाडांची विशेष काळजी घेतली. त्यामुळे वेळेत फळधारणा झाली. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी औषध फवारणीचेही नियोजन केले, असे शेट्ये यांनी सांगितले. मुंबईतील वाशी बाजारात दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत हापूसच्या पेट्या पाठविण्यासाठी बागायतदारांमध्ये चढाओढ सुरू असते. गेल्यावर्षी या कालावधीत वाशी बाजारात पेट्यांची आवक तुलनेत अधिक होती. यंदा फेब्रुवारीत रत्नागिरीतून मोजक्याच पेट्या पाठविल्या आहेत. प्रत्यक्षात हापूसच्या पेट्यांची आवक मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाढेल, असा बागायतदारांचा अंदाज आहे.

