रत्नागिरी तालुक्यातील हातीस या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहाने पीर बाबर शेख ऊरूस हिंदू-मुस्लीम समाजातील लोक एकत्र मिळून साजरा करतात. या ऊरूसासाठी देशा विदेशातून देखील लोक उपस्थित राहतात. अनेक नवस, मागणी, इच्छा आकांक्षा या स्थानावर बोलल्याने पूर्ण होते अशी या देवस्थानाची आख्यायिका आहे. त्यामुळे दरवर्षी अनेक भाविक आपले नवस फेडण्यासाठी तसेच दर्शनासाठी हातीसला येतात.
गेले दोन वर्ष कोरोनामुळे सर्वच धार्मिक उत्सवांवर बंदी घालण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील सध्याची कोरोना संक्रमितांची संख्या पाहता ती अगदी कमी आहे. त्यामुळे यंदा प्रशासनाकडून तालुक्यातील हातीस येथील पीर बाबर शेख ऊरुसाला ५० लोकांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच या ऊरुसाच्या काळामध्ये इतर नागरिकांना हातीस याठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. या बाबतचा आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आला असून, त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
हातीस येथील पीर बाबर शेख या ऊरुस येत्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत ऊरुस साजरा करण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे शासनाने आखून दिलेले नियमांचे पालन करण्यासठी आणि अतिरिक्त नागरिकांची तेथे गर्दी होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सुद्धा सक्रीय झाली आहे.
जिल्हा पोलीस दलाकडून देखील या दोन दिवशी हातीस परिसरात नाकाबंदी व चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या दोन्ही दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. दरवर्षी हातीस येथील पीर बाबरशेख ऊरुसाला लाखो भाविक हजेरी लावतात. पण गेली दोन वर्ष हा ऊरुस गर्दी होऊन कोरोनाचा फैलाव होऊ शकतो या कारणाने न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजगी दिसून आली. पण यंदा ५० लोकांच्या उपस्थितच हा ऊरुस साजरा केला जाणार आहे.