गणरायाच्या आगमनाबरोबर वरुणराजाचीही जिल्हावासीयांवर कृपादृष्टी झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी जोरदार सरींनी जिल्हावासीय सुखावले आहेत. मात्र वेगवान वाऱ्यामुळे मासेमारीवर परिणाम झाला असून, अनेक नौका बंदरातच उभ्या आहेत. जिल्ह्यात बुधवारी (ता. २०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी २४.५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामध्ये मंडणगड ४०, दापोली ४४, खेड १६, गुहागर १४, चिपळूण १९, संगमेश्वर २३, रत्नागिरी ३३, लांजा १०, राजापूर २२ मिमीची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत २८७१ मिमी. पाऊस झाला आहे.
गणरायाची चाहूल लागल्यानंतर मागील आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाचेही जिल्ह्यात आगमन झाले. पावसाचा जोर दुसऱ्या दिवशीही कायम राहिल्यामुळे कातळावरील भेगाळलेल्या भातशेतामध्ये पाणी साचले आहे. कडकडीत उन्हामुळे करपण्याची शक्यता असलेल्या भात रोपांना नव संजीवनी मिळाली आहे. पाण्याअभावी सुखण्याच्या अवस्थेत असतानाच सलग पाणी मिळाल्यामुळे हिरवीगार पिके दिसू लागली आहेत. अनेकठिकाणी रोपांमध्ये दाणे भरण्याची स्थिती आहे.
याच कालावधीत रोपांना पुरेसे पाणी मिळाले नाही, तर त्यामध्ये दाणा पक्व होत नाहीत. त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा त्रस्त झाला होता. पण गणरायाच्या कृपेने दिलासा मिळाला असून आता कापणीपर्यंत कोणतीच अडचण येणार नाही अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कातळावर सुमारे पंधरा हजार हेक्टरहून अधिक भात शेती लावण्यात आली आहे. बळीराजाला दिलासा मिळाला असला तरीही समुद्र किनारी भागात सलग दोन दिवस वेगवान वारे वाहत असल्यामुळे जिल्ह्यातील मच्छीमारीला ब्रेक लागलेला आहे.