उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथेच खंडपीठ स्थापन व्हावे यासाठी मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एकजूट निर्माण झाली आहे. प. महाराष्ट्र व कोकणातील मंत्री, खासदार, आमदार व वकिलांच्या बैठकीत खंडपीठाचा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्येक वेळेला वरच्या कोर्टात अपील करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जावे लागते. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये खंडपीठ स्थापन करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधिनी सुद्धा पुढाकार घेतला आहे.
याबाबत ९ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता यांच्यासोबत बैठक होणार असून, कोल्हापूर खंडपीठाबाबत भूमिका ठरविण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने मंत्रालयाजवळील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, , सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री सतेज पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील -यड्रावकर, शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. संजय मंडलिक, , वैभव नाईक, सदाभाऊ खोत, आ. दीपक केसरकर, राजेश क्षीरसागर तसेच मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. विवेक घाडगे, अॅड. संग्राम देसाई, कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश खडके आणि वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येत्या ९ मार्चला सायंकाळी ५ वा. मुख्य न्यायमूर्तींसोबत खंडपीठाबाबत बैठक होणार आहे. कोल्हापूर येथेच खंडपीठ स्थापन व्हावे म्हणून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील सहा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वकील तसेच जनतेचे एकमत झाले आहे.