राज्याचे हिवाळी अधिवेशन उद्या २२ डिसेंबर बुधवारपासून मुंबई मध्ये सुरु होणार आहे. नागपूर मध्ये होणारे अधिवेशन, मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे नागपूरऐवजी मुंबईमध्ये होणार आहे. कोरोनाचे कडक नियम या अधिवेशनामध्ये लावण्यात आले आहेत आणि त्यामध्ये कोणालाही सूट मिळणार नाही आहे. लसीकरणा पूर्ण असणाऱ्यांनाच केवळ प्रवेश दिला जाणार आहे. यावेळच्या अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार असून, अधिवेशन चांगलच गाजणार आहे एवढ नक्की.
अधिवेशनामध्ये ओबीसी आरक्षण, एसटी संप, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, चिपळूण नद्यांचा गाळ उपसा, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर शाब्दिक धुमश्चक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही या अधिवेशनात पार पडण्याची दाट शक्यता आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेत्यांची दुपारी बैठक देखील झाली आहे. यामध्ये अधिवेशनातल्या रणनीतीवर खलबतं होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्याचं हिवाळी अधिवेशन बुधवार पासून सुरु होत असून, हे हिवाळी अधिवेशन सध्याच्या बदलणाऱ्या वातावरणाप्रमाणे वादळी होण्याची शक्यता आहे. आधीच नागपूरमध्ये न होणारे हिवाळी अधिवेशन आणि अधिवेशनाचा कमी कालावधी यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यातच ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे ठाकरे सरकारला अजूनच डोकेदुखी होणार आहे.
त्यासोबतच विरोधक टीईटी परीक्षा घोटाळा, म्हाडा पेपर फुटी प्रकरण यासारख्या मुद्यावरून भाजप अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसांपासून सरकारला हरतर्हेने कोंडीत पकडण्याच्या तयारीत बसले आहेत. भाजपने आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली असून, अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना हर प्रकारे घेरण्याचा मास्टर प्लॅन भाजपमध्ये शिजत आहे. कमी कालावधीचे अधिवेशन असले तरी या अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठी भाजप मास्टर प्लान सह रणनीती आखत आहे.