रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून, मागील दोन महिन्यांपासून चढ्या संख्येने असणारी संक्रमितांची संख्या पूर्णपणे आटोक्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रत्नागिरी डॉ. पाटील यांनी मागील आठवड्यामध्ये निर्बंधात शिथिलता दिली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. आठवडा बाजार सुद्धा पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
मागील दोन वर्षापासून कोरोना काळामुळे हॉटेल व्यवसाय पूर्णत: ठप्प होते. त्यानंतर पुन्हा हॉटेल व्यवसाय सुरु करण्याला परवानगी देण्यात आली, परंतु त्याला वेळेचे बंधन असल्याने व्यवसायाला पुन्हा गती मिळायला विलंब होत होता. त्यामुळे या संदर्भात हॉटेल व्यावसायिक असोसिअशनने जिल्हाधिकारी रत्नागिरी यांची भेट घेऊन वेळ वाढवून मिळण्यासाठी निवेदन दिले आहे.
ग्राहकांसाठी हॉटेल रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांना देताना असोसिएशनचे उपाध्यक्ष उदय लोध, सुनील देसाई, सुहास ठाकूरदेसाई, कौस्तुभ सावंत, गणेश धुरी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांनी आठवडा बाजारासह अनेक व्यवसाय सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मात्र ग्राहकांसाठी १० वाजेपर्यंत नियम ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर हॉटेलमधून होम डिलिव्हरीची सेवा सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.
हॉटेलसाठी ५० टक्के क्षमतेला परवानगी दिली आहे. रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जमाव बंदी आदेशाची बंदी उठवण्यात आलेली असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना किमान रात्री ११ वाजेपर्यंत हॉटेल सुरु ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी हॉटेल असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.