30.1 C
Ratnagiri
Thursday, June 5, 2025

सागरी महामार्गावर दाभोळमध्ये पूल..

कोकणातील सागरी महामार्गावरील काळबादेवी आणि जयगड येथील...

चिपळूणमधील खाऊगल्ली अतिक्रमणमुक्त – पालिका प्रशासन

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील खाद्यपदार्थांच्या गाड्या पालिकेने...

वाशिष्ठी किनारी संरक्षक भिंत नलावडे बंधारा सज्ज

दरवर्षी पावसाळ्यात शहराला महापूर व अतिवृष्टीत दुथडी...
HomeMaharashtra१ खासदार असलेल्या अजित पवारांचे ४२ आमदार कसे काय?

१ खासदार असलेल्या अजित पवारांचे ४२ आमदार कसे काय?

राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निवडणूक निकालांबाबत भाष्य केले.

विधानसभा निवडणुकीनंतर गुरूवारी राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निवडणूक निकालांबाबत भाष्य केले. वरळीतील डोम सभागृहात झालेल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकांनी मते दिली पण ती आपल्यापर्यंत पोहोचली नाहीत असे सांगत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

अक्षरशः चिरफाड – राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अक्षरशः चिरफाड केली. त्यांनी अनेक उदाहरणे दिली. मनसेचे उमेदवार राजू पाटील यांना एका गावात एकही मत मिळालेले नाही. मागील निवडणुकीत या गावात त्यांना १४०० मते मिळाली होती, असे सांगत निकाल पटत नाहीत, आपल्याला लोकांनी मते दिली परंतु ती मधल्यामध्ये गायब झाली, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

१ खासदार, ४२ आमदार – निवडणूक निकाल पटत नसल्याचे सांगताना राज ठाकरेंनी ईव्हीएमविषयी शंका उपस्थित केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ४ महिन्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभा निवडणुकीत ज्या अजित पवारांच्या पक्षाचा १ खासदार निवडून आला त्यांचे ४२ आमदार कसे काय निवडून आले ? ४ ते ५ आमदार निवडून येतील की नाही अशी शंका घेण्यात येत होती, त्यांचे ४२ आमदार निवडून आले.

शरद पवारांचे केवळ १० आमदार – लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचे ८ खासदार निवडून आले. त्यांचे केवळ १० आमदार निवडून आले. हे पटत नाही. भाजपला गेल्या निवडणुकीत १०५ जागा मिळाल्या होत्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात त्यांना केवळ ९ जागा जिंकता आल्या आणि विधानसभेत तब्बल १३२ आमदार निवडून आले. काही गणितच कळत नाही असे ते म्हणाले.

थोरातांचा पराभव – काँग्रेसचे, जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला. याआधी ते ७ वेळा निवडून आले. प्रत्येकवेळी ७० ते ८० हजारांच्या मताधिक्क्यांनी ते निवडून यायचे. यावेळी १० हजार मतांनी पराभूत झाले. असे सांगत राज ठाकरेंनी अनेक उदाहरणे दिली.

सारा महाराष्ट्र बोलतोय…. – आपल्या भाषणात ईव्हीएमविषयी शंका उत्पन्न करत त्यांनी पुढे सांगितले की, काही लोकं म्हणतील की राज ठाकरेचा विधानसभेत पराभव झाला म्हणून असं बोलतोय…. पण मीच काय? अख्खा महाराष्ट्र हेच बोलतोय. भाजपला १३२ जागा, अजित पवारांनी ४२ जागा मिळाल्या आणि जे इतकी वर्षे महाराष्ट्रात काम करत आहेत त्या शरद पवारांना १० जागा ही न समजण्यापलिकडची गोष्ट आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे १३ खासदार निवडून आले. एका खासदारांच्या मतदारसंघात ६ आमदारकीचे मतदारसंघ असतात. काँग्रेसचे केवळ १५ आमदार निवडून आले. असं नेमकं काय झालं की, असे निकाल लागले. हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे तुम्ही केवळ मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपणाला मतदान केलं फक्त ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही, असे त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले.

संघालाही शंका – भाजपला १३२ जागा मिळाल्या हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही बहुधा पटलेले नाही. कारण संघाचे काही लोक मला म्हणाले ‘इतना सन्नाटा क्यूं है भाई’. निकालानंतर राज्यात कुठेही जल्लोष दिसून आला नाही. जे जिंकले त्यांचाही विश्वास बसत नाही. रोज ते आपल्या बायकोला चिमटा काढायला सांगतात…. बघ जरा मी खरंच निवडून आलोय ना? असं सांगतात, अशा मार्मिक शब्दांत राज ठाकरेंनी निवडणूक निकालांचा पंचनामा केला.

मनसैनिकांना आवाहन – असे निकाल लागणार असतील तर निवडणुका न लढलेल्याच बऱ्या असे म्हणून गप्प बसू नका. आपणाला नक्की यश मिळेल, असे सांगत राज ठाकरेंनी अन्य पक्षांच्या यशाबाबत आकडेवारीसह उदाहरणे देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी खचून न जाता कामाला लागावे, असे आवाहन केले. खचून हतबल झालेल्या लोकांचे नेतृत्व मला करायचे नाही, असे सांगत त्यांनी मरगळ झटकून कामाला लागा आपल्याला नक्की यश मिळेल असा विश्वास या मेळाव्याच्या भाषणातून त्यांनी मनसैनिकांना दिला.

RELATED ARTICLES

Most Popular