सध्या सगळीकडे कोकण आणि कोकणातील गणेशोत्सव याचीच चर्चा सुरु आहे. कोणताही सण असेल तर पहिले आठवते ते गावाकडील घर. कोकणातील गणपती उत्सवाची मजा काही औरच असते. वर्षातून एकदा सगळी मित्र मंडळी, कुटुंब मिळून घरगुती अथवा सार्वजनिक गणपतीचा आनंद घेतात. गणपतीमध्ये डेकोरेशन पासून ते खाद्य पदार्थ स्पर्धा सुद्धा शेजारी पाजारी चालतात आणि मग त्याचा एकत्र आस्वाद घेतला जातो.
कोकणात जायचं म्हणजे सध्या नक्की कुठून आणि कसे मार्ग सुरु आहेत त्याची माहिती असणे गरजेचे आहे. कोकणात जाण्यासाठी महामार्ग, रेल्वेमार्गाद्वारे आपण प्रवास करू शकतो. मुंबई पुण्याहून अनेक चाकरमानी गणपती सणासाठी कोकणामध्ये दाखल होत असतात. आत्ता पाहूया काही ठराविक मार्ग जे सध्याच्या घडीला एकदम उत्तम प्रकारे कार्यरत आहेत.
Table of Contents
मुंबई ते रत्नागिरी | How to reach from Mumbai to Ratnagiri
मुंबई ते रत्नागिरी महामार्ग प्रवास | Mumbai to Ratnagiri via Road
मुंबई ते रत्नागिरी अंतर साधारण ३४७ किमी आहे. खाजगी वाहन अथवा बसच्या सहाय्याने तुम्ही प्रवास रोडने करणार असाल तर, मुंबई-गोवा महामार्गावरून पनवेल-वडखळ-माणगांव-लोणेरे-खेड भरणे नाका येथून परशुराम घाटामार्गे चिपळूण-संगमेश्वर-निवळी फाटा-हातखंबा-आणि फायनल डेस्टीनेशन रत्नागिरी पोहोचता येते.
मुंबई ते रत्नागिरी रेल्वे प्रवास | Mumbai to Ratnagiri via Train
कोकणामध्ये यायचं तर आरामदायी प्रवास कोणता असेल तर रेल्वेचा. कोरोनाच्या संकटामुळे अनेक रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. पण गणपतीची कृपा कोकणवासियांवर कायमच आहे. त्यामुळे उद्यापासून ७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्वसामान्यांना परवडणारी पॅसेंजर गाडी पूर्ववत सुरु करण्यात येत आहे. चाकरमान्यांसाठी रत्नागिरी दिवा पॅसेंजर, रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर, सावंतवाडी-दिवा पॅसेंजर आणि मडगाव-सावतंवाडी पॅसेंजर या गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे जनशताब्दी, कोकणकन्या, तुतारी एक्सप्रेस या गाड्या सुद्धा त्यांच्या वेळेप्रमाणे धावत आहेत. सर्व गाड्यांसाठी आरक्षण महत्वाचे आहे, त्याशिवाय रेल्वेमध्ये प्रवेश मिळणार नाही. कोकण रेल्वेच्या ऑनलाईन साईटच्या मदतीने रेल्वेच्या गाडीची वेळ जाणून घ्या.
पुणे ते रत्नागिरी | How to reach from Pune to Ratnagiri
पुणे ते रत्नागिरी महामार्ग | Pune to Ratnagiri via Road
आपले अनेक कोकणवासीय पुण्यात सुद्धा स्थायिक झालेले आहेत. पुण्यामध्ये सुद्धा गणपती उत्सव एकदम जोरदार साजरा केला जातो. पण कोकांवासियाना भुरळ पडते ती कोकणचीच. पुणे ते रत्नागिरी साधारण अंतर ३०० कि. मी. एवढ आहे. पुण्याहून रत्नागिरीला येण्याकरिता ताम्हणी घाटातून, भोरमार्गे वरंधा घाटातून, वाई-महाबळेश्वरमार्गे पोलादपूर घाटातून मार्ग आहे. त्याचप्रमाणे सातारा – पाटण मार्गे कुंभार्ली घाटातून उतरून मुंबई – गोवा महामार्गावर पोहोचून रत्नागिरीला पोहोचता येते. पावसाळ्यामध्ये ताम्हणी घाटामधील सौंदर्य वाखाणण्याजोगे असते. कोणताच पर्यटक तिथे काही क्षण थांबल्याशिवाय पुढेच जाऊ शकत नाही. निसर्गाचा पसरलेला हिरवा शालू, त्यामध्ये अधि मधी उगवलेली विविध रंगी फुले, दुधासारखे वाहणारे शुभ्र धबधबे आणि खादाडीसाठी असणारी महामार्गालगतची छोटी मोठी दुकाने, और क्या चाहिये!
पुणे ते रत्नागिरी रेल्वे प्रवास | Pune to Ratnagiri via Train
रत्नागिरीहून पुण्याला जाण्यासाठी मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी रात्री ९ वाजता रेल्वे उपलब्ध आहेत. ऋतूनुसार वेळेमध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे रेल्वेने सुखकारक प्रवास करायचा असेल तर पूर्व नियोजन करून आरक्षण करूनच प्रवासाचा आस्वाद घ्यावा.
कोल्हापूर ते रत्नागिरी | How to reach from Kolhapur to Ratnagiri
कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्ग प्रवास | Kolhapur to Ratnagiri via Road
हे अंतर साधारण १३२ कि.मी.च आहे. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाची लाल परी आपल्याला कोल्हापूरला ३ तासांमध्ये पोहोचवू शकते. आंबा घाट सध्या अवघड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला असल्याने जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये चौकशी करूनच पुढील प्रवासाचे बेत आखावेत. त्याचप्रमाणे खाजगी वाहनाने हा प्रवास सुखकर आहे. आंबा घाटामध्ये अतिवृष्टीमुळे रस्ते खचल्याने त्याच्या डागडुजीसाठी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आलेली.
गोवा ते रत्नागिरी | How to reach from Goa to Ratnagiri
गोवा ते रत्नागिरी महामार्ग प्रवास | Goa to Ratnagiri via Road
गोवा ते रत्नागिरी साधारण अंतर २३५ कि.मी. एवढे आहे. प्रवासासाठी लागणारा कालावधी हा ५ तास. खाजगी बसने हातखंबा तिठ्यावर उतरून रत्नागिरीसाठी मार्गस्थ होता येते. त्याचप्रमाणे खाजगी वाहनाने महामार्गाने येणे सुद्धा सोयीस्कर आहे.
गोवा ते रत्नागिरी रेल्वे प्रवास | Goa to Ratnagiri via Train
सगळ्यात छान आणि निसर्गाच्या सानिध्यातून करायला मिळणारा प्रवास म्हणजे गोवा टू रत्नागिरी. मधी लागणारे तळकोकणातील काही जिल्हे. निसर्गाचा आस्वाद घेत, प्रवासाचा सगळा क्षीण निघून जातो. अनेक रेल्वे गाड्या प्रवासासाठी उपलब्ध आहेत. फक्त वेळ आणि आरक्षण याची पुर्वखात्री करून घेणे.
गोवा ते रत्नागिरी विमानसेवा | Goa to Ratnagiri via Airline
रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात जवळ असलेले विमानतळ म्हणजे गोवा. तळकोकणमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ सुरु झाले असून लवकरच हि विमानसेवेचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे. तो पूर्ण झाल्यावर रत्नागिरीस हवाईमार्गाने जाणे अजून सोयीचे होईल. रत्नागिरीतील विमानतळाचे काम हे सध्या फक्त मंत्रीमहोदायांसाठीच आहे. त्यामुळे लवकरच रत्नागिरीमध्ये सुद्धा विमानसेवा कार्यान्वित होईल. आणि कोकणवासियांचे उड्डाण घ्यायचे स्वप्न साकार होईल.
मागील वर्षापासून कोकणावर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तींमधून कोकणवासीय सावरून गणपतीच्या आगमनाच्या तयारीला लागला आहे. वादळ, अतिवृष्टी, महापूर, भूकंप आणि कोरोनाची महामारी यामुळे मागील वर्षापासून कोकणची परीस्थिती भयावह बनली होती, परंतु, आत्ता त्यात हळूहळू का होईना सुधारणा होत आहे. आणि गणेशोत्सव म्हटला कि, फुल ऑन जोश तो बनता है, शेवटी कोकणातील गणेशोत्सवाची मजा कोकणात प्रत्यक्ष जाऊनच अनुभवली पाहिजे, आणि त्यासाठी गणपती आत्ता ४ दिवसावर येऊन ठेपले आहेत, तर आपण सुद्धा कोकणात हजर राहिलेच पाहिजे.