भारतीय गानकोकिळा लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी झालेल्या निधनानंतर शिवाजी पार्क येथे त्यांचे स्मारक उभारावे यावरुन अनेक पक्षांचे वाद झालेत. अखेर त्या वादावर पडदा घालण्यासाठी, लता मंगेशकर यांचे बंधू पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांनी शिवाजी पार्कवरील लता मंगेशकर स्मारकाच्या वादावर भाष्य केलं आहे.
ते म्हणाले कि, बाळासाहेबांच तिथे स्मारक आहे आणि आता शिवाजी पार्क मध्ये लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून वाद सुरू आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबियांनी या वादात भाग घेण्याचं काहीही कारण नाही आहे कारण, लता दीदीचं स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावं ही आमची इच्छाच नाही आहे, असं स्पष्ट मत ह्रदयनाथ मंगेशकरांनी व्यक्त केलं आहे. आमचं केवळ एवढंच म्हणणं आहे की, शिवाजी पार्कच्या स्मारकावरून राजकारणी लोकांचा जो वाद चालला आहे तो कृपया त्यांनी आता बंद करावा. दीदीच्या जाण्याच्या आणि स्मारकाच्या बाबतीत कृपया राजकारण करू नये, असं ह्रदयनाथ मंगेशकर यांनी सांगितलं आहे.
भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे आमची दीदी हीच्या जाण्याने जी कधीच भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, ती पोकळी अवकाशाएवढी मोठी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगा ओतल्या तरी ती पोकळी कधीही भरून निघणार नाही.
ह्रदयनाथ मंगेशकर पुढे म्हणाले, “महाराष्ट्र शासनाने दीदीला लता मंगेशकर यांच्या नवे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय स्थापन करण्याचं आश्वासन दिलं होतं. स्वतः लता मंगेशकरांनी त्यांना त्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नाम. उदय सामंत, नाम. आदित्य ठाकरे यांनी ही मागणी अतिशय आनंदाने मान्य करुन उत्साहपूर्वक त्या कार्याला प्रारंभ सुद्धा केला आहे. दीदीचं संगीत स्मारक होतंय, यापेक्षा अन्य कुठलंही मोठं स्मारक होऊ शकत नाही.” “श्रद्धेला श्रद्धांजली वाहण्याची आवश्यकता नसते. लता मंगेशकर गेल्याने एक संगीत पर्व संपलंय. एक युगांत झालाय,” असंही त्यांनी विशेष नमूद केलं.