‘सरकार बदलले आणि मला दिलेली वाय प्लस सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. माझं काही कमी जास्त झालं तर ती जबाबदारी सरकारची असेल’ असे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी सांगितले आहे. दरम्यान राजन साळवी भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याबाबत विचारले असता ‘मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे’ एवढेच सांगत त्यांनी अधिक भाष्य टाळले. त्यामुळे चर्चाना अधिकच पेव फुटले आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. भाजपमधील प्रवेशाच्या चर्चेबाबत ते म्हणाले की मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केलं आहे. आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे. असं सांगत थेट उत्तर देणे टाळले आहे.
हल्लेखोराला उत्तर देण्यास समर्थ – मी नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, ३ वेळा आमदार आता उपनेता अशा विविध पदांवर काम केले केल आहे. हा माझा राजकीय प्रवास आहे. त्यामुळे तेव्हा मला अनेक वेळा धमकीही आल्या आहेत. शत्रुत्वही घ्यावं लागलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली होती. मात्र त्यानंतर दुर्दैवाने सरकार बदललं आणि माझी सुरक्षा काढून घेण्यात आली. असाही नाराजीचा सूर त्यांनी यावेळी व्यक्त केला. मात्र निवडणुकीपूर्वी मला एक सुरक्षेसाठी पोलीस देण्यात आला. मात्र मी एक सांगेन की माझ्यावर कोणी किती हल्ला केला तरी त्याला उत्तर देण्यासाठी आम चे शिवसैनिक समर्थ असून सडेतोड उत्तर देतील. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मशाल वणवा पेटवणार! – राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळत चालली असल्याचा आरोप करत बीड प्रकरणात देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करून त्याला फाशीपेक्षाही कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशीही मागणी यावेळी राजन साळवी यांनी केली. शिवसेनेची मशाल आता विझत चालली आहे का? या प्रश्नावर आक्रमक होत अजिबात नाही. हीच मशाल आता वणवा पेटवणार आणि विरोधकांना नेस्तनाबुत करणार. असाही इशारा राजन साळवी यांनी दिला आहे.