26.6 C
Ratnagiri
Wednesday, August 6, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeMaharashtraटोल मागे न घेतल्यास टोलनाके जाळू, राज ठाकरे यांचा इशारा

टोल मागे न घेतल्यास टोलनाके जाळू, राज ठाकरे यांचा इशारा

सगळ्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू अशी आश्वासने दिली होती.

टोलनाके हे राजकारणातल्या अनेक लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यांच्याकडे दर दिवसाला, आठवड्याला, महिन्याला यातून पैसे जात असतात असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यानंतर राज्यातील अनेक टोलनाक्यांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी राज्यातील टोलनाक्यांवर आक्रमक पवित्रा जाहीर केला. टोलमाफीबाबत विविध राजकीय नेत्यांनी कशा प्रकारे आश्वासने दिली होती, याचे व्हिडिओही त्यांनी दाखविली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारचाकी आणि छोट्या गाड्यांना टोल नसल्याचे शिवाय अलीकडेच सांगितले होते. त्याचाच आधार घेत राज ठाकरे यांनी ‘राज्यात कुठे आहे टोलमाफी, असा सवाल करत फडणवीस यांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

“फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार चारचाकी आणि छोट्या वाहनांना टोलमाफी असले तर मग, आमची माणसे प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील. या वाहनांवर टोल आकारला दिला जाणार नाही. याला विरोध करायचा प्रयत्न केला तर टोलनाके जाळून टाकू,” असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला. मनसेने २००९-१० मध्ये टोलविरोधात आंदोलन सुरू केल्यापासून प्रत्येक राजकीय पक्षाने टोलमुक्तीची घोषणा केल्याचे सांगत राज ठाकरे यांनी सर्व नेत्यांच्या टोलमाफीचे व्हिडिओच सादर केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चित्रफिती ऐकविल्या.

सगळ्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू अशी आश्वासने दिली होती. पण तरीही टोल बंद होत नाहीत. मधल्या काळात या सगळ्यांची सरकारे येऊन गेली; पण आजपर्यंत टोलमाफी झालेली नाही. राजकारणातल्या अनेक लोकांचे हे उदरनिर्वाहाचे साधन आहे. यांच्याकडे दर दिवसाला, आठवड्याला, महिन्याला यातून पैसे जात असतात. याच कारणामुळे टोल बंद करायला तयार नाहीत. तुम्हाला चांगले रस्ते मिळणार नाहीत. फक्त याच लोकांचा फायदा होणार आहे. या लोकांनी थापा मारल्यानंतरही पुन्हा त्याच पक्षाला मतदान होते हेच माझ्यासाठी अनाकलनीय असल्याचा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी बोलताना फक्त व्यावसायिक गाड्यांनाच टोल आकारणी होत असल्याचे विधान केले होते. त्यावर, ‘हे धादांत खोटे आहे. जर टोलमुक्ती झाल्यानंतरही आपण टोल देत असू, तर हे पैसे कुठे जातात? टोल हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा गैरव्यवहार आहे. याबाबात मी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यांचे काय उत्तर येते ते बघू. अन्यथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे चारचाकी, तीन चाकी आणि दुचाकीला टोल नसेल तर आमची माणसे प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील. या वाहनांवर टोल आकारू दिला जाणार नाही. याला विरोध करायचा प्रयत्न केला तर टोलनाके जाळून टाकू. पुढे महाराष्ट्र सरकारला काय करायचे ते सरकारने करावे, अशा इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular