मी सरकारचे एक रुपयाचे देखील नुकसान होऊ देणार नाही, जेवढे एलईडी ट्रॉलर आहेत ते जप्त झालेच पाहिजेत, तुम्हाला हवी ती मदत मिळेल पण अवैध मासेमारी थांबलीच पाहिजे, असा सज्जड दम मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी दिले आहेत. त्यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. कस्टमने सलग ३ दिवस एलईडी मासेमारी नौका पकडल्यानंतर मत्स्य विभागाच्या कारभाराबाबत शंका उपस्थित करण्यात आली. याची गंभीर दखल घेत सोमवारी मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे हे रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
परवान्यांची यादी द्या! – या बैठकीत ना. नितेश राणे यांनी काही अधिकाऱ्यांची उलट शाळा घेती. जिल्ह्यात ‘मासेमारी परवाने किती आहेत? मिरकरवाडा बंदरात किती परवाने दिले आहेत? अशी विचारणा केली. या बंदरात १५०० बेकायदेशीर नौका उभ्या आहेत, त्या नेमक्या कुणाच्या आहेत? असा सवाल करून अधिकाऱ्यांनाच बुचकळ्यात पाडले. मला सर्व नौकांच्या परवान्यांची यादी पाहिजे, असे ना. राणे यांनी सांगितले.
ते शुक्राचार्य कोण? – या बैठकीत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावताना ना. राणे पुढे म्हणाले की, एलईडी मासेमारी पूर्णपणे बंद झाली पाहिजे आणि इतर विभागांनी अशी नौका पुन्हा पंकडली तर मी तुम्हाला जबाबदार धरणार, या खात्यातदेखील काही शुक्राचार्य आहेत ते एलईडी फिशींग करणाऱ्यांना मदत करतात, असा आरोप ना. राणे यांनी केला.
कदापि मान्य नाही! – शासनाचा एक रुपयाचादेखील महसूल बुडू देणार नाही. ६० ते ७० लाखांची रिकव्हरी व्हायची आहे. ती १००% रिकव्हरी झाली पाहिजे. चुकीच्या पद्धतीने अवैध मासेमारी कुणी खतपाणी घालत असेल तर ते मी मंत्री असेपर्यंत कदापि मान्य करणार् नाही.
१० गस्ती नौका देतो! – कारवाईचा विषय आल्यानंतर गस्ती नौका नसल्याचे या आढावा बैठकीत पुढे आले. त्यावेळी तुम्हाला १० गस्ती नौका आणून देतो, अनधिकृत मासेमारी थांबलीच पाहिजे, पण तसे होण्यासाठी अधिकाऱ्यांची मानसिकता कारवाईची असायला पाहिजे, असे ना. राणे यांनी सांगितले.
मिरकरवाड्यातील अनधिकृत बांधकामे पाडणार – मिरकरवाडा जेटीबाहेर मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. काही बांधकामांच्या मागून संशयास्पद कारवाया सुरू आहेत. अशा बांधकामांवर आता बुलडोझर फिरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
त्यांना देशाबाहेर काढणार – बांगलादेशी रोहिंग्याबाबत बोलताना ते म्हणाले की, आमची सरकार म्हणून भूमिका स्पष्ट आहे. मात्र ज्याचं कुणाचं अशा रोहिंग्यांवर प्रेम उफाळून आलं असेल त्यांनी बांगलादेशात जाऊन रहावे, एकाच विमानांचे तिकिट काढून देतो, त्यांना मांडीवर घेऊन बांगलादेशात जा आणि – तिथेच रहा, असा टोला ना. नितेश राणे यांनी लगावला आहे.