पाकिस्तानने गुजरात किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात गोळीबार केला आहे. पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीच्या कर्मचार्यांनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ भारतीय नौकेवर रोखून बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्या सर्व चकमकीमध्ये महाराष्ट्रामधील एक मच्छिमार मृत्युमुखी पडला आहे. आणि दुसरा जखमी झाला. ही घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडल्याचे एक प्रत्यक्षदर्शी पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलीस अधीक्षक सुनील जोशी यांनी सांगितले कि, जलपरी या मासेमारी नौकेवर असलेल्या महाराष्ट्र राज्यातील ठाण्यामधील मच्छिमार, पाकिस्तानच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. बोटीवर एकूण सात मच्छिमार उपस्थित होते, त्यापैकी एक किरकोळ जखमी झाला आहे.
ठाण्यातील ३२ वर्षाचे मृत मच्छिमार श्रीधर रमेश चामरे यांचा मृतदेह रविवारी ओखा बंदरात आणण्यात आला. त्यांच्यावर पोरबंदर नवीबंदर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून, अरबी समुद्रामध्ये गुजरातमधील १२ नॉटिकल मैलांपर्यंतच्या घटना त्यांच्या अधिकार प्रवण क्षेत्रामध्ये येतात. चामरे हे २५ ऑक्टोबर रोजी जलपरी बोटीत सात सदस्यांसह ओखाहून मार्गस्थ झाले होते. त्या सात जणांपैकी पाच गुजरातमधील आणि दोन महाराष्ट्राचे रहिवासी होते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले.
यापूर्वी देखील अशा काही घटनांची नोंद करण्यात आली आहे. मार्च महिन्यामध्ये पाकिस्तानने ११ भारतीय मच्छिमारांना अटक केलेली आणि त्यांच्या दोन बोटी देखील जप्त करण्यात आल्या होत्या. फेब्रुवारीमध्येही, पाकिस्तानच्या पाण्यात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली पाकने १७ भारतीय मच्छिमारांना अटक करून त्यांच्या ३ बोटी ताब्यात घेतल्या होत्या.
अरबी समुद्रामध्ये असणाऱ्या सागरी सीमा या स्पष्ट दिसत नसल्यामुळे अनेकदा पाकिस्तान आणि भारत एकमेकांच्या मच्छिमार्याना अटक करतात. आणि मच्छिमारांकडे देखील त्यांचे नेमके ठिकाण जाणून घेण्यासाठी तंत्रज्ञानाने सुसज्ज नौका नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. काहीवेळा नोकरशाही आणि दीर्घकालीन कायदेशीर प्रक्रियेमुळे मच्छिमारांना कित्येक महिने अगदी वर्षांपर्यंत सुद्धा तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागते.