देशभरात आजादी का अमृतमहोत्सव निमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी देखील या निमित्ताने संपूर्ण जिल्हाभरात लोकसहभागातून सीसीटीव्हीचे जाळे उभारण्याचा संकल्प केला आहे. जिल्ह्यात प्रोजेक्ट नेत्रा अंतर्गत सुमारे ७५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी नागरिकांच्या मदतीद्वारे प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे. यासाठी दुकाने, मंदिर, दर्गा, हॉटेल, शाळा, कॉलेज,हाऊसिंग सोसा. आदी विविध आस्थापनांना आवाहन करण्यात आले आहे.
अनेक गुन्ह्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. पोलीस दलाच्यावतीने व्यापाऱ्यांच्या बैठकीत एक विशेष आवाहन करण्यात आले आहे, सध्या ज्या ज्या अस्थापानामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वित आहेत, त्यांनी त्यातील फक्त एक कॅमेरा रस्त्याच्या दिशेने बाहेरील बाजूस वळवावा असे आवाहन करण्यात आले आहे. रविवारी कोरोनाचे नियम पाळत रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने उपस्थित होते.
पोलीस दलाच्या वतीने लोक सहभागातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाबाबत व्यापाऱ्यांना संपूर्ण माहिती देण्यात आली व आपल्या सोबत सामाजिक सुरक्षिततेसाठी हा उपक्रम किती गरजेचा आहे हे सांगण्यात आले. काही महिन्यांपूर्वी सर्व अस्थापनामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे असे पोलिसांमार्फत सुचविण्यात आले होते, ज्या आस्थापनात अजूनही कॅमेरे नाहीत त्यांनी देखील ते बसवावेत असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
या सर्व कॅमेऱ्यांची जिओग्राफिकल नोंद करण्यात येणार असून गुन्ह्यांच्या शोधकार्यात याचा उपयोग करण्यात येणार आहे. सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा एक महत्वाचा उपक्रम असल्याने व्यापाऱ्यांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आश्वासन या बैठकीत दिले आहे.