रत्नागिरी मध्यवर्ती भागामध्ये रस्ते, गटारे, पाईप लाईन टाकण्याची कामे काही प्रमाणात सुरु आहेत. काही ठिकाणी अजून उर्वरित काम शिल्लक असल्याने काही ठिकाणची गटारे बांधून ती उघडीच ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना डोळ्यात तेल घालून प्रवास करावा लागत आहे.
मारुती मंदिर गोडबोले स्टॉप येथे नव्याने बांधण्यात आलेले गटार वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी प्रचंड मनस्ताप ठरत आहे. नव्याने बांधण्यात आलेले हे गटार आहे की मृत्यूचा सापळा असा सवाल उपस्थिताना पडला आहे. मारुती मंदिर ते मजगाव रोड रस्त्यावर संध्याकाळी प्रचंड गर्दी असते. या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणात वाहतुक आणि पादचारी यांची वर्दळ सुरु असते. त्यामुळे वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याच्या कडेने जाणारे पादचारी गटाराच्या बाजूने जात असतात मात्र आयसीआय बँकेच्या विरुद्ध दिशेला असलेले गटार बंदिस्त न करता उघड्या स्थितीत ठेवले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी काळोखात या उघड्या गटाराचा भाग दिसून येत नाही.
सायंकाळच्या वेळी लहान मुलांची या ठिकाणावरून ये-जा सुरु असते. काळोखामध्ये गटार बंद आहे कि उघड आहे ते दिसून येत नसल्याने, जर एखादं लहान मुलं चुकून गटारात पडल्यास काही विपरीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागच्या आठवड्यामध्ये या उघड्या गटारामध्ये एक गाय पडली होती. यामध्ये ती दुखापतगस्थ झाली होती. तसेच बुधवारी रात्री याच गटारांमध्ये खलील इस्माईल पांगरकर हे ६८ वर्षाचे गृहस्थ रस्त्याने जात असताना तोल जाऊन पडले. त्यामुळे त्यांच्या हाताला, पायाला मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झाली आहे. एखादी विपरीत दुर्घटना घडली आणि यामध्ये कोणाचा मृत्यू ओढवला तर त्याची जबाबदारी रत्नागिरी नगरपरिषद आणि लोकप्रतिनिधीनी घेणार का? त्यामुळे लवकरात लवकर संबंधित विभागाने अपुर्या कामाकडे लक्ष पुरवावे अशी स्थानिकांनी मागणी केली आहे.