26.1 C
Ratnagiri
Sunday, January 4, 2026
HomeRatnagiriरत्नागिरी शहरातील जुन्या वृक्षांची पाहणी, पावसाळ्यापूर्वीची तयारी

रत्नागिरी शहरातील जुन्या वृक्षांची पाहणी, पावसाळ्यापूर्वीची तयारी

मोठे वृक्ष, धोकादायक झाडे कोसळून घरे, गोठ्यांचे नुकसान होते.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात शेकडो वर्षे वयाच्या धोकादायक पुरातन वृक्षांची रत्नागिरी नगरपालिकेकडून पाहणी केली जात आहे. जे धोकादायक वृक्ष खासगी मालकीच्या जागेत आहेत त्या जागामालकांना योग्य दक्षता घेण्यास सांगितली जात आहे. त्याचबरोबर रत्नागिरी पालिकेच्या जागेत असलेल्या धोकादायक वृक्षांबाबत आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. यंदा पावसाळा लवकर सुरू होऊन तो समाधानकारक असण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकापासून खालच्या भागात परिघीय किंवा सभोवताली दाटीवाटीची वस्ती आहे.

या भागामध्ये अनेक पुरातन किंवा शेकडो वर्षे जुने पिंपळ, वड, चिंच असे मोठ्या बुंध्याचे आणि विस्तारलेले वृक्ष आहेत. यातील काही वृक्ष पोखरलेले आणि पूर्णपणे सुकलेले आहेत. यातील धोकादायक वृक्षांची माहिती जमा केली जात आहे. मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्याच्या वेळी या वृक्षांना पर्यायाने माणसांसह घर, दुकानांना धोका होण्याची भीती असते. असे वृक्ष हेरून आवश्यक ती सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे. मारुती आळी येथील एक मोठे चिंचेचे खासगी जागेतील झाड दाट लोकवस्तीत असून, ते जमिनीजवळच पोखरल्याने धोकादायक बनले आहे.

रत्नागिरी शहर समुद्रकिनारी भागात असल्यामुळे पावसाळ्यात वादळ, वेगवान वारे यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मोठे वृक्ष, धोकादायक झाडे कोसळून घरे, गोठ्यांचे नुकसान होते. जीवावर बेतणारे प्रसंगही घडतात. विद्युत वाहिन्यांवर अशी झाडे पडल्यामुळे मोठे नुकसानही होते आणि वीजपुरवठा खंडित होतो. याला आळा घालण्यासाठी धोकादायक झाडे तोडण्यात येतात. आतापर्यंत मोठ्या वादळांना शहरवासीयांनी तोंड दिले आहे. भविष्यात असे धोके निर्माण होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular