नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतीला संरक्षण मिळावे, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. गतवर्षी अवकाळी पाऊस, विविध वादळं आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीचा शेतकऱ्यांना फटका बसला होता. तसा फटका यावर्षी बसू नये आणि शेतीतील संभाव्य धोका ओळखून या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवावा, असे आवाहन कृषी विभाग आणि अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीतर्फे करण्यात आले आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला पीक संरक्षण मिळावे म्हणून शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये काही ठरावीक रक्कम भरून भातासह नागली पिकांचे विमा उतरवले जातात. या योजनेमध्ये जोखीमस्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के ठेवण्यात आला आहे.
प्रतिकूल हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, दुष्काळ, कीड व रोग आदींमुळे उत्पादनात होणारी घट, काढणी पश्चात नुकसान आदी निकषान्वये नुकसानीची छाननी करून विमा उतरवलेल्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई दिली जाते. या योजनेमध्ये वैयक्तिक शेतकरी, भाडेपट्टीने वा कुळाने शेती करणारे शेतकरी सहभागी होऊ शकतात. पीक विमा योजनेमध्ये भात, नागली, उडीद या पिकांचा समावेश असून, या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवावा, असे तालुका कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
पीक विमा हप्ता दर व संरक्षित रक्कम – प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एक हेक्टर भातपिकासाठी ४५७.५० रुपये हेक्टरी विमा हप्ता ठेवण्यात आला आहे. नागलीसाठी ८७.५० रुपये आणि उडीदसाठी ६२.५० रुपये एकरी विमा हप्ता ठेवण्यात आला आहे. या पिकाचे प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झाल्यास भाताला प्रतिहेक्टरी ६१ हजार रुपये तर नागलीसाठी ३५ हजार, उडीदसाठी २५ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम ठेवण्यात आली आहे.