महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यातील वाहतूक व्यवसाय हा महाराष्ट्रातील व्यावसायिकांना डावलून बाहेरच्यांना देण्याचा प्रयत्न सुरू असल्याने काल, वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी आलेली बस काल रात्री फोडली आहे. आयपीएल व्यवस्थापन आणि सरकार दरबारी विनंती करून देखील, काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे मनसेने हा दणका दिला असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली आहे.
आयपीएलचा पंधरावा हंगाम येत्या २६ मार्चपासून सुरु होणार आहे. तर, शेवटचा सामना २९ मे रोजी खेळला जाणार आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नई- कोलकाता यांच्यात खेळवला जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. मुंबईत वानखेडे, ब्रेबॉर्न तर नवी मुंबईतील डी वाय पाटील हि स्टेडियम हि मोठी असल्याने तिथेच हे सामने खेळवले जाणार आहेत.
मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत आयपीएलची खेळाडू ज्या बसमधून आलेत त्याची तोडफोड केली. आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम देण्याच्या वेळी मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना वगळण्यात आल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काल रात्री ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेल ताजसमोर ही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी यावर स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की, तुम्ही म्हणता, आम्ही गुंडगिरी केली? पण का केली ते आधी जाणून घ्या. आयपीएल महाराष्ट्रामध्ये तर आयपीएलमध्ये वापरल्या जाणाऱ्या बसेस दिल्लीतून का मागवल्या जात आहेत? सरकार एकदा म्हणत की, आयपीएल महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे अर्थ चक्राला गती मिळेल मग महाराष्ट्राच्या वाहतूदारांना यातून वंचित का ठेवलं जात आहे, असा सवाल नाईकांनी केला आहे.