जनतेचे प्रश्न सोडविणे हे आपले काम आहे. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन न्याय मिळवून देणे हे कर्तव्य आहे. जनतेच्या समस्या, त्यांचे प्रश्न मार्गी लावताना कोणी हेतूपुरस्सर टाळत असतील त्यांना सेवेत राहण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी देवरूख येथे व्यक्त केले. तसेच लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी वर्गाने जनतेशी स्नेह वाढवून काम करा. जनता दरबारात अनेक प्रश्न उपस्थित होत असतील, तर कार्यकर्त्यांनीदेखील आत्मपरीक्षण करणे आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी दिला. देवरूख येथे नृसिंह मंगल कार्यालयात आयोजित जनता दरबारात सामंत, राजेश सावंत, प्रशांत यादव, वैभव खेडेकर, राजेंद्र महाडिक, रोहन बने, प्रमोद अधटराव, रूपेश सावंत, प्रमोद पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम, प्रांताधिकारी विश्वजित गाताडे, तहसीलदार अमृता साबळे आदी उपस्थित होते. ते बोलत होते. यावेळी आमदार किरण जनतेचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडविण्यासाठी हा जनता दरबार घेण्यात आला आहे.
सर्वसामन्याचे प्रश्न अधिकाऱ्यांनी समजावून घेऊन ते सोडवावेत, यासाठी जनता दरबार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले. विकासकामे वेळीच केली, तर अडचणी येणार नाहीत. पक्षाच्या ध्येयधोरणांनुसार जे योग्य काम करतील त्यांना पदे मिळतील. जनता दरबारात १०० हून अधिक नागरिकांनी निवेदने दिली. कासारकोळवण गावात पुलाअभावी बस जात नसल्याने पूल व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्या पुलाचे काम लवकरात लवकर केले जाईल, असे खासदार राणे यांनी सांगितले. मतिमंद मुलांच्या शाळेसाठी निधी दिला जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले. संच मान्यतेसाठी कोकणासाठी वेगळे निकष लावावेत, अशी मागणी करण्यात आली असता यावर मुंबईत स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन राणे यांनी दिले. पुये तर्फे देवळे पूल व्हावा, अशी मागणी करण्यात आली. दख्खन धनगरवाडी येथे पायाभूत सुविधांची मागणीदेखील करण्यात आली.
कार्यकर्त्यांची कान उघडणी – कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, कारणांवर मात करावी, जनतेची सेवा करावी. येणाऱ्या निवडणुकीत युती होईल किंवा नाही होणार यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, तुम्ही चर्चा करू नका. मित्रपक्ष आपला वैरी नाही. राजकारण केलेले समजले तर निवडणुकीच्या स्पर्धेतून बाहेर काढेन, अशा शब्दांत राणे यांनी कार्यकर्त्यांची कान उघडणी केली. तसेच पक्षाचे पदाधिकारी असल्याने तुम्ही तुमची कामे माझ्याकडे घेऊन येऊ शकता. जनता दरबारामध्ये लोकांनी कैफियत मांडावी, ही अपेक्षा आहे. तुम्ही तुमच्या मागण्यांचे निवेदन जनता दरबारात देणे संयुक्तिक वाटत नाही, असेही कार्यकर्त्यांना सुनावले.

 
                                    