हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुरूवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. मात्र पावसाने संततधार लावलेली नसली तरी सरीवर सरी बरसत आहेत. या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, नाल्यांची पातळी वाढत असून शुक्रवारी खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडण्यास सुरूवात केल्याने खेडमधील नागरिक आणि व्यावसायिक सतर्क झाले आहेत. सुदैवाने पावसामुळे कोठेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त नाही. हवामान खात्याने शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे ३ दिवस कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरतो आहे.
गुरूवारी मध्यरात्रीपासूनच रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. दुपारच्या सत्रात काही काळ पावसाने विश्रांती घेतली. तरी सायंकाळी पुन्हा एकदा पावसाच्या मोठ्या सरी कोसळताना पहायला मिळाल्या. यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. खोळंबलेली लावणी मार्गी लागत आहे. संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडत असल्याने आनंदाचे वातावरण आहे. या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली होती. सायंकाळच्या सुमारास पाणी इशारा पातळीच्या जवळ होते. पावसाचा जोर वाढल्यास ही पातळी ओलांडण्याची भीती खेडवासियांना वाटत होती. त्यामुळे नागरिक सतर्क झाले आहेत. चिपळूणमध्येही जोरदार पाऊस पडत आहे.