रत्नागिरीपासून साधारण ७ किलो मीटर अंतरावर एक सुंदर असे काळबादेवी गाव वसलेले आहे. एक बाजूला खाडी आणि एक बाजूला समुद्र अशी अनोखी देणगी या गावाला लाभली आहे. या गावातच स्थानापन्न झाली आहे, कालिका देवी. पाथरदेवहुन गावांमध्ये एन्ट्री केल्यावर ५-६ बसस्टॉप पुढे गेल्यावर श्री देव रामेश्वर आणि श्री देवी कालिका मातेचे खाडीच्या किनारी मंदिर आहे. काळबादेवी गावाची ही दोन ग्रामदैवत आहेत.
भक्तांच्या हाकेला धावून जाणारी, नवसाला पावणारी आणि विशेष म्हणजे माहेरवाशीणीच्या अडीनडीला, संकटात धावून जाणारी आई कालिकेचा महिमा सर्वदूर पसरलेला आहे. सध्या सुरू असलेल्या नवरात्रीच्या उत्सव काळामध्ये गावातील अनेक माहेरवाशिणी आवर्जून देवीची ओटी भरण्यासाठी आणि दर्शनासाठी सहकुटुंब येतात.
या देवीबद्दल काही आख्यायिका ऐकिवात आहेत. कालिका माता गोव्याहून समुद्रामार्गे कांडल्यातून प्रवास करून काळबादेवी गावामध्ये आली. तिथे आल्यानंतर तिने एक व्यक्तीला दृष्टांत दिला की, की मी इथे आले आहे. माझी योग्य ठिकाणी स्थापना कर. त्याकाळी पोर्तुगीजांची सत्ता असल्याने, सर्वसामान्य भारतीयांचं त्यांच्यापुढे काही चालत नसे. गावातील एक माणूस दारूचा धंदा करत असे आणि त्या काळात गलबत भरून त्याचा दारूचा माल खाडी किनारी आला आणि त्याची खबर पोर्तुगीज पोलिसांना लागली. त्यामुळे तो माल जप्त करण्यासाठी पोलिसांनी झाडाझडती सुरू केली. त्या गावकऱ्याने आपले नुकसान होऊ नये म्हणून, कालिका मातेचा धावा करायला सुरुवात केली आणि प्रार्थना केली की, या सर्व दारूच्या जागी कणी निर्माण होऊ दे. आणि पोलिसांनी झडती घेतली असता, ज्या बॅरलमध्ये हाथ घालत त्यामध्ये कणी निघत होती. त्यामुळे चिडून तेथेच झडती थांबवून, मिळालेली खबर पक्की असताना, कोणत्या दैवी चमत्कारामध्ये एवढी ताकद आहे हे पाहण्यासाठी मंदिरात जाऊन त्या देवीची विटंबना केली. परंतु, असे काहीतर इंग्रजांच्या हातून घडणार याची देवीला पूर्वकल्पना असल्याने देवी आपल्या मूर्तीरूपात न राहता त्याच मंदिर परिसरातील वडाच्या झाडावर येऊन बसली. आणि मग गावातील एका पुजाऱ्याला दृष्टांत देऊन घडलेली कहाणी सांगितली. त्यामुळे ती विटंबना केलेली मूर्ती मंदिराच्या पाठील भागामध्ये ठेवण्यात आली असून नवीन मूर्ती मंदिरामध्ये विधीवत स्थापन केली.
गावामध्ये महाशिवरात्री, शिमगा, श्रावणात नामसप्ताह सोहळा, नवरात्री असे अनेक सण मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. श्रीदेव रामेश्वर हे शंकराचे स्वयंभू देवस्थान आहे. या मंदिरामध्ये पुरातन १७३७ सालातील वजनदार घंटा पाहायला मिळते. त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये एक सागरगोट्यासारखे पाषाण देखील आहे. असे म्हणतात की जो खरा भक्त असेल त्यांनाच तो पाषाण उचलला जातो, नाहीतर तो जराही ढिम्म हलत नाही.
काळबादेवी गावामध्ये बहुतकरून भंडारी समाजातील लोकांची वस्ती आहे. काही नोकरदार आहेत तर जास्त करून सर्वांचा मासेमारी व्यवसाय आहे. त्यामुळे जेवणामध्ये कायम भात आणि मासे हे ठरलेले. परंतु, श्री देव रामेश्वर आणि श्री देवी कालिकेचा श्रावणात नामसप्ताह सोहळा असतो त्या काळामध्ये गावातील कोणीही सात दिवस माश्यांना हातही लावत नाहीत हे विशेष. वर्षातील हे सात दिवस प्रत्येक घरामध्ये शाकाहारीच जेवण शिजते.
प्रत्येक गावाची वेगळीच खासियत असते तशीच तेथील देवस्थानाची सुद्धा.