रत्नागिरी शहरी आणि ग्रामीण भागामध्ये रस्त्यावर फेकणाऱ्या कचऱ्याच्या समस्येनी नागरिक हैराण झाले आहेत. शहरी भागामध्ये नगर पालिकेच्या वतीने ओला आणि सुका कचरा व्यवस्थापन केले जाते. परंतु, ग्रामीण भागामध्ये विशेष करून अशा सुविधा नसल्याने अनेक जण ओला आणि सुका कचरा रस्त्यावरच टाकताना दिसून येत आहेत. त्यावर ग्रामपंचायतीने त्यावर काहीतरी योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
रत्नागिरी नजिकच्या खेडशी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दाटीवाटीची लोकवस्ती असलेल्या गणेशनगर, लक्ष्मीनारायण नगर, एकता नगर येथील सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील कचर्यामुळे हा परिसर अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त बनल्याने संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी खेडशी ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे.
शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात जिथे जिथे सार्वजनिक कचरा कुंडी बसवण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आल्यामुळे संबंधिताना आर्थिक दंड बसवण्यात येत आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात बेशिस्तपणे कचरा टाकणाऱ्यांवर नियंत्रण आले आहे.
खेडशी ग्रामपंचायतीच्यावतीने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडे निवेदन देवून ही मागणी करण्यात आली आहे. गणेशनगर, लक्ष्मीनारायण नगर व एकता नगर या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. तसेच हा परिसर दिवसेंदिवस अधिक विकसित होत आहे. अशा या लोकवस्ती असलेल्या परिसरातील सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकण्यात आलेला आहे. या कचर्यामुळे परिसरात राहणार्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उघड्यावर टाकण्यात आलेल्या कचर्यावर आता मोकाट कुत्र्यांचा मोठा वावर सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.