कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी आणि स्थानिक तरुणांच्या हाताला रोजगार देऊन कोकणाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी लवकरात लवकर रिफायनरी प्रकल्प होणे गरजेचे आहे. रिफायनरी होण्याच्या दृष्टीने उद्योजक किरण सामंत यांनी कसोसीने प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. आपण रिफायनरी समर्थनाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट मत उद्योजक आणि बाळासाहेबाची शिवसेनचे नेते किरण सामंत यांनी व्यक्त केले.
उद्योजक किरण सामंत यांची नुकतीच सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकरी समितीवर निवड झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांतील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती व विकासक्षेत्रांची निवड करून त्या क्षेत्रांचा सूक्ष्म आराखडा तयार करणे व त्या आधारे परिणामकारक अंमलबजावणी करून पर्यावरणक्षम शाश्वत विकास घडवणे हा या योजनेचा उद्देश आहे. किरण सामंत आतापर्यंत राजकारणात फ्रंटफुटला कधीच दिसले नाहीत. पण, पडद्यामागून सूत्र हालवण्यात त्यांचा हातखंडा असल्याचं अनेक जण सांगतात. त्यामुळे त्यांना किंगमेकर देखील म्हटलं जात.
लवकरात लवकर कोकणात रिफायनरी प्रकल्प कार्यान्वित झाला तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन तरुणांना नोकऱ्या मिळतील. म्हणूनच हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी उद्योजक किरण सामंत यांनी कंबर कसली आहे. या प्रकल्पाला कोकणातून पूर्ण समर्थन मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न चालू केल्याची माहिती त्यांनी दिली.
रिफायनरीला पूर्वी असणारा तीव्र विरोध आता कमी झाला आहे. मोठ्या प्रमाणात रिफायनरी व्हावी यासाठी अनेक ग्रामीण भागातून समर्थक पुढे सरसावत आहेत. जगातील सर्वांत मोठा हा प्रकल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यासह कोकणाचा आर्थिक स्तर उंचावणार आहे. बेरोजगारी दूर होऊन त्या अनुषंगाने अनेक पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. दळवळणाची साधणे वाढणार आहेत. त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू आणि उद्योजक किरण सामंत यांनी रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी पुढाकार घेतला आहे.